झारखंडच्या सरायकेला येथे नक्षलवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच पोलीस कर्मचा-यांचा मृत्यू झाला आहे. पोलीस पथक या भागात शोध मोहीम राबवून परतत असताना या पथकावर नक्षलवाद्यांनी हल्ला केला. नक्षलवाद्यांनी हल्ला केल्यानंतर शहीद झालेल्या जवानांची हत्यार घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.

या हल्ल्यात एकुण पाच पोलीस कर्मचारी शहीद झाले. ज्यामध्ये दोन एएसआय आणि तीन शिपायांचा समावेश आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना शुक्रवारी सायंकाळी सरायकेला जिल्ह्यातील तिरूलडीह पोलीस ठाणे ह्द्दीत घडली. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या वाहनावर बेछुट गोळीबार केला. पोलीस पथक शोध मोहीमेवरून परतत असताना, आधीपासूनच सापळा रचून व दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी जवान सावध नसताना हा हल्ला केला. पोलिसांकडून करण्यात आलेल्या गोळीबारात काही नक्षलवादी देखील जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.