“गलवाण खोऱ्यात घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण देशाला धक्का बसला आहे. संकटाच्या या काळात काँग्रेस पक्ष पूर्णपणे सरकारला सहकार्य करेल व साथ देईल” असे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बुधवारी सांगितले. गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांबरोबर लढताना शहीद झालेल्या भारताच्या २० वीर सैनिकांना त्यांनी नमन केले. या शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असून त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती मिळावी असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.

गेल्या दीड महिन्यापासून चिनी सैन्याने लडाखमध्ये घुसखोरी केली आहे. देशात सध्या प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे पंतप्रधानांनी समोर येऊन सत्य सांगितले पाहिजे असे सोनिया गांधी म्हणाल्या. “चिनी सैन्याने भारतीय प्रदेशावर कसा ताबा मिळवला? भारतीय सैनिक का शहीद झाले?. सध्या तिथे काय परिस्थिती आहे? आमचे अजून किती सैनिक बेपत्ता आहेत, किती सैनिक जखमी झालेत?” याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी अशी मागणी त्यांनी केली.

“चीनने कुठल्या भागावर ताबा मिळवला आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकारचा विचार, धोरण, योजना काय आहे?” असे सोनिया गांधी म्हणाल्या. “संकटकाळात काँग्रेसपक्ष सैन्य आणि सरकारसोबत आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत देश एकजूट होऊन शत्रूचा सामना करेल” असा विश्वास सोनिया गांधी यांनी व्यक्त केला. पंतप्रधान मोदींनी या संकटकाळात सत्य आणि तथ्याच्या आधारावर देशाला विश्वास द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली.