पुढच्या वर्षी पहिल्या तीन-चार महिन्यांत देशातील जनतेला करोनावरील लस पुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. तसेच त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व जनतेला ही लस पुरवली जाईल, असंही त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “पुढील वर्षाच्या पहिल्या तीन ते चार महिन्यांत देशातील जनतेला लसीचा पुरवठा करण्यात आपण सक्षम असू. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये २५ ते ३० कोटी जनतेला लस पुरवण्याची योजना आम्ही आखली आहे.”

दरम्यान, दिल्लीतील बुरारी येथील निरंकारी समागम मैदानावर आंदोलन करत असलेल्या शेकडो आंदोलकांना आवाहन करताना डॉ. हर्षवर्धन म्हणाले, “माझी सर्वांना विनंती आहे की त्यांनी कोविडचे नियम लक्षात ठेवावेत तसेच त्यानुसार वर्तन करावं. यामध्ये तोंडाला मास्क लावणे आणि फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करणे आवश्यक आहे. आपल्या आरोग्यासाठी ही महत्वाची बाब आहे.”