भारत आणि बांगलादेश एकमेकांच्या सागरी क्षेत्रात (एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमकि झोन) संशोधन करण्यास परवानगी देण्याविषयी सामंजस्य करारावर लवकरच स्वाक्ष-या करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रीय सागरविज्ञान संशोधन संस्थेचे (नॅशनल इस्टिटय़ूट ऑफ ओशनोग्राफी) संचालक डॉ. एस. डब्ल्यू. ए. नकवी यांनी गुरुवारी दिली. यावेळी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धनही उपस्थित होते.
असे एकत्रित संशोधन प्रकल्प हाती घेम्यास सध्या राजकीय वातावरण अगदी योग्य असल्याचे नक्वी यांनी सांगितले. “अनेक शेजारी देशांकडे स्वतंत्ररित्या संशोधन करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षित मनुष्यबळ आणि सुविधा नाहीत. ते देश भारताकडे सहकार्याच्या अपेक्षेने पाहत आहेत. त्यादृष्टीने एक प्रकल्प आम्ही बांगलादेशच्या सहकार्याने सुरू करत आहोत. यासंबंधी एनआयओ आणि ढाका विद्यापीठात येत्या देन महिन्यांत सामंजस्य करार होईल,” असे नक्वी म्हणाले. यासंदर्भात १० ते १२ फेब्रुवारीला होणा-या कार्यशाळेत सविस्तर कार्यक्रम ठरवला जाईल. असा प्रकराचा करार होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे आपल्याला यापूर्वी न गेलेल्या सागरी क्षेत्रात जाण्याची संधी मिळेल, असे नक्वी म्हणाले. वातावरणाचा आणि नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचा अभ्यास असे विषय यापूर्वीच ठरवम्यात आले आहेत.