गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि चीनदरम्यान तणावात मोठी वाढ झाली आहे. गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी बैठकांचं सत्र सुरू होतं. परंतु एका ठिकाणी बैठका सुरू असताना दुसरीकडे मात्र चीनच्या कुरापती सुरूच होत्या. त्यानंतर २९-३० ऑगस्ट रोजी रात्री चीनच्या सैनिकांचा घुसखोरीचा डाव भारतीय लष्कराच्या जवानांनी उधळून लावला. त्यानंतर तोंडघशी पडलेल्या चीनकडून सतत काही ना काही वक्तव्य केली जात आहेत. बुधवारी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी त्यांनी भारतावर आरोप करत भारताच्या कारवाईमागे अमेरिकेचा हात असल्याचा दावा केला.

भारताकडून सीमेबाबत झालेल्या करारचं उल्लंघन करण्यात आलं आणि भारतानं एलएसी ओलांडून पुढे येण्याचा प्रयत्न केल्याचा दावा चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आला. याव्यतिरिक्त त्यांनी तिबेटचा उल्लेखही केला. “दोन्ही देशांचे जवान एकमेकांसमोर आले असले तरी भारताचा कोणताही जवान शहीद झाला नाही. अमेरिकेतील माध्यमांकडून भारतीय जवान शहीद झाल्याचा दावा करण्यात आला होता,” अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ शुनयिंग यांनी दिली.

भारतीय लष्कराच्या जवानांच्या मदतीसाठी तिबेटी लोकही पुढे आले होते यासंदर्भातही त्यांना सवाल करण्यात आला. यावर प्रवक्त्या भडकल्या आणि याचं उत्तर भारतालाच विचारण्यास त्यांनी सांगितलं. तिबेटी लोकं आणि सीआयमध्ये अनेक संबंध होते एवढं आम्हाला माहित आहे. जे तिबेटी लोकांना आपल्याकडे शरण देतात त्या सर्व देशांचा आम्ही विरोध करत असल्याचंही त्यांनी नमूद केलं.

“तिबेटच्या प्रकरणावरही लक्ष देणं आवश्यक आहे. यामध्ये अमेरिकेची भूमिका आहे. आता आम्ही भारत आणि तिबेटच्या सैनिकांमध्ये काय संबंध आहेत हे जाणून घेण्यास उत्सुक आहोत,” असं चीनकडून सांगण्यात आलं. यापूर्वी चीननं अनेकदा भारतावर आरोप केले होते. अमेरिकेसोबत जाऊन भारत आपल्या शेजारी राष्ट्रांबरोबर संबंध अधिक खराब करत असल्याचंही यापूर्वी चीननं म्हटलं होतं.

भारतावरच आरोप

“भारत सतत स्वत:ला खरं सिद्ध करण्याच्या मागे लागला आहे. भारतानंच शनिवारी सर्वप्रथम कराराचं उल्लंघन केलं आणि परिस्थिती बिघडवण्याचा प्रयत्न केला,” असं चीनच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.