पूर्व लडाखमधील पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर काठांवरून चीन आणि भारताच्या सैन्याने बुधवारपासून माघारीस सुरुवात केली, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाने जाहीर केले. परिणामी़, पूर्व लडाखमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून सीमासंघर्षांमुळे भारत-चीन यांच्यात निर्माण झालेला तणाव निवळण्याचे संकेत आहेत.

पँगाँग सरोवर येथून चीन आणि भारताच्या सैन्याने एकाच वेळी आणि संघटितपणे माघार घेण्यास सुरुवात केली असल्याचे चीनच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू क्वियान यांनी बुधवारी सांगितले. भारत आणि चीन यांच्यात कमांडर पातळीवरील चर्चेतील नवव्या फेरीत झालेल्या निर्णयानुसार हे पाऊल उचलण्यात आल्याने क्विआन यांनी प्रसृत केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. मात्र, भारताने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारत (पान १० वर) (पान १ वरून) आणि चीन यांच्या सैन्यामध्ये पूर्व लडाखमध्ये संघर्ष निर्माण झाला. पँगाँग सरोवर परिसरात दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आले होते. गेल्या वर्षी १५-१६ जूनदरम्यान गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्या सैन्यात संघर्ष झाला होता. त्यात अनेक भारतीय जवान शहीद झाले. चीनचीही त्यात मनुष्यहानी झाली.

पूर्व लडाखच्या सीमेवरील हा तिढा सोडवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान लष्करी व राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. मात्र, त्यातून काहीच निष्पन्न होत नव्हते. चीन आणि भारत यांच्यात कमांडर स्तरावरील चर्चेची नववी फेरी २४ जानेवारीला मोल्दो- चुशुल सीमेवर चिनी हद्दीत झाली होती. त्या वेळी सैन्यमाघारीबाबत उभयतांमध्ये मतैक्य झाले होते. त्यानुसार उभय देशांनी सैन्य माघारी घेतल्याचे मानले जाते.

राजनाथ सिंह यांचे आज निवेदन

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने सैन्यमाघारीची घोषणा केली असली तरी याबाबत भारताने कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र, लडाखमधील सद्य:स्थितीबाबत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे आज, गुरुवारी राज्यसभेत निवेदन देणार आहेत.

नऊ महिन्यांपासून संघर्ष

पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात नऊ महिन्यांपासून सीमासंघर्ष सुरू आहे. गलवान खोऱ्यात उभय देशांच्या सैन्यांमध्ये संघर्ष होऊन रक्तपात झाला होता. त्यानंतर भारतीय सैन्याने पँगाँग सरोवरकाठच्या अनेक महत्त्वाच्या शिखरांचा ताबा घेत चीनला शह देण्याचा प्रयत्न केला. या सीमासंघर्षांमुळे उभय देशांदरम्यान तणाव वाढला होता. सैन्यमाघारीमुळे तणाव निवळण्यास मदत होईल, असे मानले जाते.