देशात करोनाच्या दुसरी लाट असताना एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ८५.६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. गेल्या २४ तासात ४ लाख २२ हजार ४३६ रुग्णांनी करोनावर मात केली. पहिल्यांदाच एका दिवसात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.

देशात मागच्या २४ तासात २ लाख ६३ हजार जणांना करोनाची बाधा झाली आहे. ७ मे रोजी हाच आकडा ४ लाख १४ हजार इतका होता. त्या तुलनेत रुग्ण संख्येत २७ टक्क्यांनी घट झाली आहे. देशात मंगळवारी रुग्णवाढीचा दर १४.१० टक्के इतका आहे. देशात आतापर्यंत १.८ टक्के लोकांनाच करोनाची लागण झाल्याचंही त्यांनी सांगितलं. हे प्रमाण अमेरिकेत १०.१ टक्के, ब्राझीलमध्ये ७.३ टक्के, फ्रान्समध्ये ९ टक्के, रशियात ३.४ टक्के आणि इटलीत ७.४ टक्के इतकं आहे.

देशातील आठ राज्यांमध्ये १ लाखांहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर १८ राज्यांमध्ये ५० हजारांपेक्षा कमी रुग्ण सक्रीय आहेत. दिल्ली, यूपी आणि गुजरातमध्ये करोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होताना दिसत आहे. १३ राज्यांमध्ये करोना संक्रमण दर हा ५ ते १५ टक्के इतका आहे.

करोनावर मात करणाऱ्यांना ९ महिन्यांनंतर लस देण्यात यावी; सरकारी पॅनलचा सल्ला

देशात करोना रुग्ण कमी होत असले तरी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागात करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.