फेब्रुवारी महिन्यात डोकं वर काढलेल्या करोनाची दुसरी भयावह लाट ओसरताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक कमी होत असून, गेल्या २४ तासांतील आकडेवारी मोठा दिलासा देणारी आहे. देशात तब्बल दोन महिन्यांनंतर दिवसभरात (५ जून) सर्वात कमी करोनाबाधितांची नोंद झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही आठवड्यांपासून चिंतेत भर टाकणाऱ्या मृत्यूंची संख्याही कमी होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून गेल्या २४ तासांतील आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासांत एक लाख १४ हजार ४६० नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर एक लाख ८९ हजार २३२ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. याच कालावधीत देशात दोन हजार ६७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या १४ लाख ७७ हजार ७९९ रुग्ण उपचाराधीन असून, करोना बळींची एकूण संख्या तीन लाख ४६ हजार ७५९ वर पोहोचली आहे.

हेही वाचा – श्रेयवादातून करोना उपायांकडे दुर्लक्ष; अमर्त्य सेन यांनी भारतीयांना केलं संबोधित

२४ तासांत आढळून आलेले नवी रुग्ण – १,१४,४६०

२४ तासांत रुग्णालयातून घरी परतलेले रुग्ण – १,८९,२३२

२४ तासांत झालेले मृत्यू – २६७७

देशातील एकूण रूग्ण – २,८८,०९,३३९

करोनातून बरे झालेले एकूण रुग्ण – २,६९,८४,७८१

एकूण करोनाबळी – ३,४६,७५९

देशात उपचाराधीन असलेले एकूण रुग्ण – १४,७७,७९९

आतापर्यंत लसीकरण झालेल्यांची संख्या – २३,१३,२२,४१७

खासगी रुग्णालयांकडे लशीचा ५० टक्के साठा; मोठ्या रुग्णालयांची मक्तेदारी

महाराष्ट्रातील परिस्थिती कशी आहे?

राज्यातही करोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मृतांची संख्या कमी झाली असली, तरी मृत्युदर मात्र साडेचार टक्क्यांवरून पाच टक्क्यांवर गेला आहे. मुंबई, पुण्यासह आता राज्याच्या इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही कमी होत आहे. २२ ते २८ मे या आठवड्यात राज्यात १,३९,६९५ रुग्णांचे नव्याने निदान झाले होते आणि ५,८९८ रुग्णांचा मृत्यू झाला होता. २९ मे ते ४ जून या आठवड्यात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात घट झाली असून नव्याने निदान होणाऱ्या रुग्णांची संख्या ९२,३५० पर्यंत घसरली. मृतांची संख्याही या आठवड्यात कमी झाली असून ४,७४१ मृत्यू झाले आहेत. परंतु नव्याने बाधित झालेल्या रुग्ण आणि मृतांची संख्या यांची तुलना केली असता गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात मृत्युदर चारवरून पाच टक्क्यांवर गेला आहे. राज्याचा एकूण मृत्युदरही १.९४ टक्क्यांवरून १.६९ टक्क्यांवर गेला आहे.