भारत शाश्वत मार्गानेच वाढीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहे त्याचवेळी नागरिकांना विकासाचे फायदे मिळतील याचीही काळजी घेत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वन, हवामान बदल मंत्री प्रकाश जावडेकर यांनी संयुक्त राष्ट्रांच्या हवामान कृती परिषदेत शनिवारी केले. सेटिंग द कॉनटेक्स्ट फॉर दी इंडस्ट्री ट्रान्झिशन या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, पंतप्रधान मोदी यांनी झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट प्रारूप राबवले आहे. त्यानुसार कुठल्याही उत्पादनात दोष राहणार नाहीत व कुठल्याही उत्पादनांच्या निर्मितीत पर्यावरणावर परिणाम होणार नाही याची काळजी घेतली आहे. आमचा देश वाढीच्या पथावर मार्गक्रमण करीत आहे. लोकांना आम्ही न्याय नाकारू शकत नाही, त्यांना विकास नाकारू सकत नाही पण आम्ही शाश्वत मार्गाने विकास करू. हवामान कृती परिषदेचे आयोजन संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनियो गट्रेस यांच्या पुढाकाराने करण्यात आले असून त्यात २०१६ मधील पॅरिस कराराची अंमलबजावणी करण्यासाठी कृती करण्यास विविध देशांना भाग पाडण्याचा उद्देश आहे. जावडेकर म्हणाले की, भारतात आम्ही कार्बन गोळा करून त्याचा वापर कारखान्यातील कच्चा माल तयार करण्यासाठी करणार आहोत, टनामागे सहा डॉलर्सचा कार्बन कर लावण्यात आला असून त्यामुळे उद्योगांनाही कोळशाचा वापर कमी करण्याचा विचार करावा लागत आहे. हे धोरण असलेला भारत हा बहुदा एकमेव देश आहे.