पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांमुळे भारताची ताकदच कमकुवत झाली. देशात पहिल्यांदाच मंदी आली आहे या आशयाचं ट्विट करत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणामुळेच भारत मंदीच्या फेऱ्यात अडकला आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. राहुल गांधी यांनी यासंदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचाही दाखला दिला आहे. जुलै ते डिसेंबर या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी आहा ८.६ टक्के राहिल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी मोदी सरकारला धारेवर धरलं आहे.

आणखी वाचा- … तर दोन वर्षांपर्यंत सरकार भरणार PF; आत्मनिर्भर भारत ३.० अंतर्गत १२ घोषणा करणार

चालू आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत विकास दर (जीडीपी) उणे २३.९ टक्क्यांनी खाली आला होता. गेल्या वर्षी २०१९-२० मध्ये पहिल्या तिमाहीत विकासदर ५.२ टक्के होता. करोना आणि लॉकडाउन यामुळे उत्पादन, गृहनिर्माण, खाण, सेवा क्षेत्रात मोठी घसरण झाल्यामुळे ही वेळ ओढवली होती.

आणखी वाचा- कोण आहे भाजपाचा सायलेंट व्होटर? नरेंद्र मोदींनी केला खुलासा; म्हणाले…

बिहार निवडणूक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास हाच आमच्या यशाचा आधार आहे असं म्हटलं होतं. २१ व्या शतकातील भारताच्या नागरिकांनी वारंवार स्पष्ट संदेश दिला आहे की, प्रामाणिकपणे विकास करणाऱ्यांना देशाची सेवा करण्याची संधी मिळेल. सर्व राजकीय पक्षांकडून हीच अपेक्षा आहे. देशासाठी काम करा. बिहारमधील निकाल हेच दाखवत आहेत. २४ तास देशाचा विचार करा, नवे करण्याचा प्रयत्न करा. लोक तुमच्या मेहनतीला प्रतिसाद देतील. देशाचा विकास हाच भाजपचा मुख्य आधार आहे. असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केलं होतं. दरम्यान आज देशाच्या विकासाच्या मुद्द्यावरच शाब्दिक प्रहार करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.