जगाच्या अर्थिक विषमता अहवालातून उत्पन्नाबाबत जागतिक स्तरावर भारताबाबत एक लाजीरवाणी बाब समोर आली आहे. गेल्या दशकांमध्ये जगातील उत्पन्नाच्या पातळीत वाढ झाली त्यामुळे आर्थिक विषमताही निर्माण झाली असून २०१६ मध्ये जगाचे निम्म्यापेक्षा अधिक उत्पन्न हे एकूण लोकसंख्येच्या १० टक्के लोकांकडे गेल्याचे या अहवालातील आकडेवारी सांगते. यामध्ये आर्थिक विषमतेच्याबाबतीत भारत जगात अव्वल स्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आर्थिक विषमतेच्या या ट्रेन्डनुसार, जगाच्या विविध भागांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्न दिसून येते. यामध्ये युरोपात सर्वाधिक आर्थिक समानता पहायला मिळते, कारण इथल्या लोकसंख्येच्या टॉपच्या १० टक्के लोकांकडे ३७ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. तर मध्य आशियात सर्वाधिक आर्थिक विषमता असून इथे लोकसंख्येतील टॉपच्या १० टक्के लोकांकडे ६१ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. फर्स्टपोस्टने याबाबत वृत्त दिले आहे.

यामध्ये भारतातील एकूण लोकसंख्येच्या टॉप १० टक्के लोकांकडे ५५ टक्के उत्पन्नाचा वाटा आहे. देशातील विविध भागातही उत्पन्नामध्ये विषमता दिसून येते. सन १९८० पासून उत्तर अमेरिका, चीन, भारत आणि रशिया या देशांनी वेगाने झालेली आर्थिक विषमता वाढ अनुभवली आहे. या काळात केवळ युरोपमध्येच सातत्याने आर्थिक वाढ झाली होती.

१९८० च्या काळात युरोप आणि युनायटेड स्टेट्स-कॅनडा रिजनमध्ये आर्थिक विषमतेची एकच पातळी होती. मात्र, आता यामध्ये बदल झाला आहे. १९८०च्या काळात या भागांमध्ये टॉपच्या १० टक्के लोकांकडे ३० टक्के उत्पन्नाचा वाटा होता. या आकडेवारीच्या तुलनेत २०१६ मध्ये युरोपमध्ये ही वाढ केवळ ३४ टक्क्यांवर पोहोचली होती. मात्र, अमेरिकेत ती ४७ टक्क्यांवर जाऊन पोहोचली होती.

भारतात १९९१ मध्ये झालेल्या आर्थिक उदारीकरणानंतर देशात उच्च उत्पन्न वाढ दिसून आली होती. त्याचबरोबर आर्थिक विषमतेतही वाढ झाली होती. १९९० पर्यंत १ टक्के लोकांकडेच सर्वाधिक उत्पन्न होते. त्यानंतर २०१६ पर्यंत त्यात सातत्याने वाढ होत गेली.