भारत हा जगातील सर्वाधिक वेगवान करोना प्रतिबिंधक लसीकरण मोहिम राबवणारा देश ठरला आहे. त्यानुसार, केवळ सहा दिवसांत भारतात १० लाख कोविड योद्ध्यांना लस देण्यात आली, केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी ही माहिती दिली.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं की, “१० लाख जणांना आपण सहा दिवसांत लस दिली. अमेरिकेनं ती १० दिवसांत, स्पेननं १२ दिवसांत, इस्रायलनं १४ दिवसांत, युकेनं १८ दिवसांत, इटलीनं १९ दिवसांत, जर्मनीनं २० दिवसांत तर यासाठी युएईला २७ दिवस लागले.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, आज दुपारी २ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, भारतानं आजवर २५ लाखांहून अधिक लसीचे डोस दिले आहेत. देशात अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होत असून सध्या देशभरात १,७५,००० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी होण्याचा हा ट्रेन्ड कायम आहे.

देशातील दोन राज्यांमध्ये सध्या ४०,००० आणि त्याहून अधिक अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या दोन राज्यांमध्ये देशातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी ६७ टक्के रुग्ण आहेत. यामध्ये केरळमध्ये ७२,००० तर महाराष्ट्रात ४४,००० आहेत. देशातील करोनाबाधितांचे प्रमाण ५.५१ टक्के असून ते सातत्याने कमी होत आहे.

दरम्यान, ओडिशा, हरयाणा, राजस्थान, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेश ही राज्ये चांगली कामगिरी करत आहेत. या राज्यांमध्ये ३५ टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली आहे. तर तामिळनाडू, दिल्ली, झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड आणि महाराष्ट्रात २१ टक्क्यांहून कमी लसीकरण झालं आहे.