भारत हे हिंदू राष्ट्रच असून देशातील सर्व हिंदूंना संघटित करण्याची गरज आहे आणि त्यासाठी सध्या पोषक वातावरण आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.
हिंदू आणि मुस्लीम यांच्यात जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा तेव्हा मध्यममार्ग उदयाला आला आणि तो म्हणजे हिंदुत्व, असे मोहन भागवत यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या एका प्रसिद्ध कवितेचा हवाला देत सांगितले.
हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे आणि ती वस्तुस्थिती आहे. आम्ही हीच संकल्पना घेऊन वाटचाल करणार आहोत. देशाला आघाडीवर नेण्यासाठी सर्व हिंदूंनी संघटित झाले पाहिजे. आपला देश आघाडीवर राहिला तर त्याचा लाभ संपूर्ण जगाला होईल, असेही भागवत म्हणाले.
मेरठ आणि गझियाबाद येथे संघाच्या मेळाव्यात भागवत पुढे म्हणाले की, आपल्याकडे चांगली जाण असल्याने आपल्याला ते केले पाहिजे. आपण एकमेकांशी लढत राहिलो तर आपले संरक्षण होऊ शकणार नाही. संघ परिवाराची विचारसरणी देशात आणि जगाच्या कोणत्याही भागात स्वीकारार्ह नव्हती अशी एक वेळ होती. मात्र आता संघासाठी पोषक वातावरण आहे, असेही सरसंघचालक म्हणाले.