ना खाऊंगा ना खाने दूंगा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी अनेक कार्यक्रमांमध्ये बोलताना म्हणतात. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीतील प्रचारादरम्यान भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा मुद्दा मोदींच्या अजेंड्यावर होता. मात्र अद्याप तरी यामध्ये मोदींना अपेक्षित यश आलेले नाही. फोर्ब्सकडून आशिया खंडातील भ्रष्टाचारी देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये आशिया खंडातील देशांमध्ये भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलकडून याबद्दलचे सर्वेक्षण करण्यात आले होते. भारत हा आशिया खंडातील सर्वात भ्रष्ट देश असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे शेजारी देश चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण भारतापेक्षा कमी असल्याचे ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलची आकडेवारी सांगते. भारतात भ्रष्टाचाराचे प्रमाण तब्बल ६९ टक्के असल्याचे सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे मोदींना देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे असल्यास अजून बरेच प्रयत्न करावे लागतील, असे दिसून येते. आशिया खंडात भ्रष्टाचाराची समस्या गंभीर आहे. आशियातील व्हिएतनाम, थायलंड, पाकिस्तान, म्यानमार आणि भारत या पाच देशांमध्ये भ्रष्टाचाराचे प्रमाण अतिशय जास्त आहे. यामध्ये भारत पहिला क्रमांकावर असून दुसऱ्या क्रमांकावर व्हिएतनाम आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर थायलंड आणि चौथ्या स्थानावर पाकिस्तान आहे. विशेष म्हणजे भारतातील भ्रष्टाचाराचे प्रमाण ६९ टक्के असताना पाकिस्तानमधील भ्रष्टाचाराचे प्रमाण ४० टक्के इतके आहे. 'भारतातील सहापैकी पाच सेवा सार्वजनिक सेवांसाठी लाच द्यावी लागते. शाळा, रुग्णालय, ओळखपत्र, पोलीस क्षेत्रातील भ्रष्टाचाराचे प्रमाण सर्वाधिक आहे. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या निम्म्याहून अधिक व्यक्तींनी या क्षेत्रातील कामे करुन घेण्यासाठी लाच द्यावी लागत असल्याची माहिती दिली,' असे फोर्ब्सने लेखात म्हटले आहे. मात्र फोर्ब्सने भ्रष्टाचारविरोधी लढ्यासाठी मोदींचे कौतुकदेखील केले आहे.