भारताने जमिनीवरुन जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणाऱ्या पृथ्वी-२ क्षेपणास्त्राची मंगळवारी रात्री यशस्वी चाचणी केली. ओडिशाच्या बालासोर येथील प्रक्षेपण केंद्रावरुन ही चाचणी करण्यात आली. स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांडद्वारे ही चाचणी घेण्यात आली.

यापूर्वी, याच ठिकाणाहून २० नोव्हेंबर रोजी पृथ्वी-२ क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. काल झालेल्या क्षेपणास्त्राची चाचणी पूर्णपणे यशस्वी झाली असून त्याने सर्व आवश्यक मानकं पूर्ण केली आहेत. या क्षेपणास्त्रामध्ये ५०० ते १००० किलो वजनाची स्फोटकं वाहून नेण्याची क्षमता आहे.

या क्षेपणास्त्रामध्ये लिक्विड प्रोपल्शन इंजिन वापरण्यात आले आहेत. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३५० किमीपर्यंत आहे. यामध्ये अॅडव्हान्स गाईडन्स सिस्टिमही बसवण्यात आली आहे. ही यंत्रणआ आपल्या लक्ष्याचा अचूनकतेने वेध घेते.

पृथ्वी क्षेपणास्त्र सन २००३ पासून अद्यापपर्यंत भारतीय लष्कराला सेवा पुरवत आहे. डीआरडीओद्वारे निर्माण करण्यात आलेले हे पहिले क्षेपणास्त्र आहे. काल झालेल्या या क्षेपणास्त्राच्या नव्या आवृत्तीच्या चाचणीवर डीआरडीओच्या वैज्ञानिकांची नजर होती.