भारताला पुढच्या दहा वर्षांसाठी सशक्त आणि स्थिर सरकार हवं आहे असे मत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी व्यक्त केलं आहे. आपण महाशक्ती झालो तरच आपण आर्थिक आघाडीवर यशस्वी ठरवू शकतो. आपण एक महासत्ता म्हणून जगाशी स्पर्धा केली पाहिजे. आपण तंत्रज्ञानात यशस्वी झालो तरच ही बाब शक्य आहे असेही डोवाल यांनी म्हटले आहे. ७० च्या दशकात अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत चीनपेक्षा आघाडीवर होता. आत्ताही आपण आघाडीवर जाऊ शकतो. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची असेल तर आपल्या देशाला पुढची दहा वर्षे एक स्थिर आणि कठोर निर्णय घेणारे सरकार हवे आहे.

आपले लोकप्रतिनिधी जे कायदे आपल्यासाठी तयार करतात त्याचे काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. येत्या काही दिवसात भारत जगातली तिसरी महासत्ता होईल यात शंकाच वाटत नाही असेही डोवाल यांनी म्हटले आहे. चीनमधील अलीबाबा आणि इतर अनेक कंपन्या यांना सरकारचे सहाय्य मिळाले म्हणून त्या प्रगती करू शकल्या. त्याचप्रमाणे भारताची प्रगती व्हायची असेल तर खासगी कंपन्यांना पाठिंबा द्यायला हवा असेही त्यांनी म्हटलं आहे.

देशाला लोकप्रिय निर्णयांसोबतच कठोर आणि काटेकोर निर्णयांचीही गरज आहे. राष्ट्रहितासाठी काही कठोर निर्णय घ्यावेच लागतील. तरच आपला देश चांगली प्रगती करू शकतो असेही डोवाल यांनी म्हटले आहे. कोणत्याही कमकुवत आघाडीने देशाचे नुकसानच होईल असे म्हणत त्यांनी विरोधकांवरही निशाणा साधला आहे.