सोमवारी जोगबनी येथील इस्लामपुर येथील भारत नेपाळ सीमेजवळ भारतीय नागरिक आणि नेपाळी सुरक्षारक्षकांमध्ये मारहाणीची घटना घडली. दोन्ही देशांतील नागरिकांना प्रवेश नसणाऱ्या नो मॅन्स लॅण्ड घोषित करण्यात आलेल्या परिसरामध्ये चहा पिण्यावरुन वाद झाला. या मारहाणीनंतर सशस्त्र सीमा बलाचे (एसएसबी) जवान सीमेवर तैनात करण्यात आले असून दोन्हीकडून वाहतूक बंद ठेवण्यात आलीय.

सीमेजवळ मारहाण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर सब-डिव्हिजनल ऑफिसर सुरेंद्र कुमार अलबोला, पोलीस उपअधीक्षक रामपुकार सिंह हे घटनास्थळी दाखल झाले. जोगबानी येथील इस्लामपूरचे दोन भाग आहेत. यापैकी एक भाग भारतामध्ये आहे तर दुसरा नेपाळमध्ये आहे. येथील एक पूल हा नो मॅन्स लॅण्ड परिसर आहे. हा पूल फक्त लोकांना येण्या-जाण्यासाठी वापरला जातो. या ठिकाणी भारतीय नागरिक नसीम आणि नेपाळचे शरीफ यांनी सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास इस्लामपूरच्या भारताकडील भागामध्ये काही लोकं या पुलाला लागून असलेल्या दुकानात चहा पीत होते.

अचानक नेपाळच्या काही सुरक्षारक्षकांनी आमच्यावर लाठीचार्ज केल्याचा आरोप भारतीय नागरिकांनी केला आहे. त्यामुळे संतापलेल्या भारतीयांनी या सुरक्षा कर्मचाऱ्यांना मारहाण केली. काही लोकांनी वातवरण खराब करण्यासाठी हे घडवून आणल्याचा दावा फारबिसगंजमधील अधिकाऱ्यांनी केलाय. लाठीमार झाल्यानंतर भारतीयांनी या सुरक्षारक्षकांनी दगडफेक केल्याने आणखीन गोंधळ उडाला.

घटनास्थळी असणाऱ्या एसएसबीच्या ५६ व्या बाटलीयनचे अधिकारी दिनेश प्रसाद यांनी मारहाण झाल्याची कबुली दिली आहे. दोन्ही देशांमधील नागरिकांना सध्या एकमेकांच्या देशामध्ये जाण्यास बंदी घातली आहे. दोन्ही कडील नागरिकांना या पुलाच्या आजूबाजूला जमा होण्यास बंदी घालण्यात आली असल्याने चहा पिणाऱ्यांशी नेपाळच्या सुरक्षारक्षकांचा वाद झाला आणि त्यातूनच हा गोंधळ उडाल्याचं सांगितलं जात आहे.