कर्तारपूर कॉरिडोर पायाभरणीच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानला गेलेले काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांचा खलिस्तानी नेता गोपाल चावला सोबतचा फोटो समोर आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर सिद्धूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दल व अन्य विरोधी पक्षांनी केली आहे.

गुरुवारी भारतात परतलेल्या सिद्धू यांना ज्यावेळी या वादावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी पाकिस्तानात माझ्या सोबत पाच ते दहा हजार फोटो काढण्यात आले. त्यामध्ये चावला किंवा चीमा कोण आहे त्याला मी ओळखत नाही असे त्यांनी उत्तर दिले.

भारत-पाकिस्तानमधील शत्रुत्व संपले पाहिजे. कर्तारपूर कॉरिडोरच्या निमित्ताने ७१ वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. भारत आणि पाकिस्तान सरकारने चांगला निर्णय घेतला. कर्तारपूर कॉरिडोर हा ईश्वराने बनवलेला रस्ता आहे अशा शब्दात काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

कर्तारपूर साहिब मार्गिकेच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी पाकिस्तानाला गेलेले नवज्योत सिंग सिद्धू आज मायदेशी परतले. त्यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारत-पाकिस्तानमधील शत्रूत्व संपले पाहिजे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. पंजाबच्या गुरुदासपूर जिल्हयातील डेरा बाबा नानक व पाकिस्तानातील नरोवाल येथील गुरुद्वारा कर्तारपूर साहिब या दोन ठिकाणांना जोडणारी मार्गिका तयार करण्यात येणार आहे. त्या कार्यक्रमासाठी सिद्धू पाहुणे म्हणून पाकिस्तानला गेले आहेत.

सिद्धूंचा हा पाकिस्तान दौरा वादात सापडला आहे. पायाभरणी समारंभात खलिस्तानी नेता गोपाल चावला हा देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे. पंजाबमधील मंत्री आणि काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासोबत चावलाने छायाचित्रही काढले असून हे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर सिद्धूंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी अकाली दल व अन्य विरोधी पक्षांनी केली आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सिद्धंनी पाकिस्तानातून निवडणूक लढवल्यास ते नक्कीच जिंकून येतील असा विश्वास व्यक्त केला. सिद्धू तुम्ही इथून निवडणूक लढवावी. लोक तुमच्यावर भरपूर प्रेम करतात तुम्ही नक्कीच निवडणूक जिंकाल असे इम्रान खान म्हणाले.