नवी दिल्ली : गेल्या २९ वर्षांच्या परंपरेनुसार नववर्षांच्या पहिल्याच दिवशी भारत व पाकिस्तान या देशांनी एकमेकांच्या अणुआस्थापने तसेच कैद्यांच्या याद्यांचे आदानप्रदान केले.

द्विपक्षीय करारातील तरतुदीनुसार या देशांना एकमेकांच्या अणुआस्थापनांवर हल्ले करण्यास प्रतिबंध आहे. भारत व पाकिस्तान यांच्या परराष्ट्र मंत्रालयांनी अणुआस्थापनांच्या यादीची देवाणघेवाण केली. काश्मीर प्रश्नावरून दोन्ही देशात तणावाचे संबंध असतानाही या वर्षी ही परंपरा सुरू राहिली. भारत व पाकिस्तान यांच्या राजनैतिक सूत्रांच्या माध्यमातून ही प्रक्रिया पार पाडण्यात आली. ३१ डिसेंबर १९८८ रोजी याबाबत करार झाला होता, त्याची अंमलबजावणी २७ जानेवारी १९९१ रोजी सुरू करण्यात आली. या करारानुसार दोन्ही देशांनी एकमेकांना त्यांच्या आण्विक आस्थापनांची माहिती देणे बंधनकारक आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षांत जानेवारीच्या पहिल्या दिवशी यादीची देवाणघेवाण केली जाते. १ जानेवारी १९९२ रोजी पहिल्यांदा आण्विक आस्थापनांच्या याद्यांची देवाणघेवाण करण्यात आली होती. त्यामुळे यंदा लागोपाठ २९ व्या वर्षी याद्यांची देवाणघेवाण करण्यात आली.

कैद्यांच्या यादीची देवाणघेवाण

इस्लामाबाद -पाकिस्तानने त्यांच्या तुरुंगात असलेल्या कैद्यांची यादी भारताला प्रदान केली असून पाकिस्तानात एकूण २८२ भारतीय कैदी असून त्यात ५५ नागरिक तर २२७ मच्छीमार आहेत. २१ मे २००८ अनुसार राजनैतिक संपर्क करार झाला होता, त्यानुसार दोन्ही देशांनी त्यांच्या देशात असलेल्या कैद्यांची यादी एकमेकांना देणे अपेक्षित आहे. भारत सरकारनेही अशी यादी पाकिस्तानी उच्चायुक्तालयाला सादर केली आहे, अशी माहिती पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने दिली आहे.