नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशपेक्षा वाईट स्थिती; ११७ देशांमध्ये १०२ वे स्थान, चीनचा २५ वा क्रमांक नवी दिल्ली : जागतिक भूक निर्देशांकात २०१९ मध्ये भारताचा १०२ वा क्रमांक लागला असून २०१८ मध्ये तो ११७ देशांत ९५ व्या स्थानावर होता. त्यामुळे आता नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या देशांनंतर भारताचा क्रमांक आहे. बेलारूस, युक्रेन, तुर्की, क्युबा व कुवेत या देशांनी वरचे क्रमांक पटकावले आहेत. जागतिक भूक निर्देशांकाच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली आहे. याबाबतचा अहवाल ‘कन्सर्न वल्र्डवाइड’ ही आयरिश संस्था तसेच वेल्ट हंगर हिल्फी ही जर्मन संस्था यांनी संयुक्तपणे तयार केला असून भारताची परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले आहे. २००० मध्ये भारताचा ११३ देशात ८३ वा क्रमांक होता, तर आता ११७ देशात तो १०२ वा आहे. यातील भारताचे गुण २००५ मध्ये ३८.९ होते ते २०१० मध्ये ३२ झाले, नंतर २०१० मधील ३२ वरून ते २०१९ मध्ये ३०.३ झाले आहेत. कमी पोषण, उंचीच्या तुलनेत कमी वजन, पाच वर्षांखालील मुलांचे उंचीच्या तुलनेत कमी वजन, मुलांची वाढ खुंटणे, कुपोषण, बालमृत्यू दर, पाच वर्षांखालील मुलांचा मृत्यू दर हे घटक यात विचारात घेतले जातात. कमी वजनाच्या मुलांचे प्रमाण २००८-२०१२ या काळात १६.५ टक्के होते ते २०१४-२०१८ या काळात २०.८ टक्के झाले. ६ ते २३ महिने वयोगटातील पुरेसे पोषण मिळणाऱ्या बालकांचे प्रमाण ९.६ टक्के होते. सगळ्या देशात भारतातील मुले वजनाच्या तुलनेत उंचीच्या निकषात मागे पडली असून त्यांचे प्रमाण २०.८ टक्के आहे. येमेन, दिजबौती या देशांनीही या निकषात भारताला मागे टाकले आहे. नेपाळ (७३), श्रीलंका (६६), बांगलादेश (८८), म्यानमार, (६९), पाकिस्तान (९४) या देशांची स्थिती भूकेबाबतीत वाईट असली तरी ती भारताइतकी वाईट नाही. चीनचा क्रमांक २५ वा लागला आहे. पाच वर्षांखालील बालकांचा मृत्यू दर, वाढ खुंटणे, अपुरे अन्न मिळून कमी पोषण या निकषात भारताची कामगिरी सुधारली आहे. हागणदारी मुक्तीत अपयश; आरोग्य धोक्यात स्वच्छ भारत योजना भारताने लागू केली असली तरी अजून भारत देश हागणदारी मुक्त झालेला नाही. तेथे उघडय़ावर शौचास जाण्याची पद्धत सुरूच आहे. त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात आहे, असे अहवालात म्हटले आहे. भारताची भूक निर्देशांकातील निराशाजनक कामगिरी पाहता आतातरी पंतप्रधान मोदी यांनी राजकारणावर कमी भर देऊन देशातील मुलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मुले हेच देशाचे भवितव्य आहे. भारताचा क्रमांक २०१० मध्ये ९५ वा होता आता तो १०२आहे. ६ ते २३ वयोगटातील ९३ टक्के मुलांना पुरेसा आहार मिळत नाही हे यातून स्पष्ट झाले आहे. - कपील सिबल, काँग्रेस नेते व माजी मंत्री