देशातील करोनाचे रुग्ण सलग दुसऱ्या दिवशी आठ हजारांहून अधिक संख्येने वाढले. गेल्या चोवीस तासांमध्ये ८,३९२ रुग्णांची नोंद झाल्याने एकूण रुग्णांची संख्या एक लाख ९० हजार ५३५ वर पोहोचली आहे. करोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेल्या दहा देशांमध्ये भारत सातव्या क्रमांकावर आहे. करोनाबाधितांच्या संख्येत आठवडय़ापूर्वी भारत नवव्या क्रमांकावर होता. आता मात्र देशातील रुग्णांची संख्या फ्रान्समधील रुग्णांपेक्षा जास्त झाली आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये ४,८३५ रुग्ण बरे झाले असून एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ९१,८१९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ४८.१९ टक्क्यांवर पोहोचले आहे. १८ मे रोजी हे प्रमाण ३८.२९ टक्के होते.आतापर्यंत ३८ लाख ३७,२०७ नमुना चाचण्या झाल्या असून दररोज एक लाख चाचण्या करता येणे शक्य झाले आहे. देशभरातील एकूण मृत्यूची संख्या ५,३९४ वर पोहोचली आहे.