देशात करोनाचा कहर वाढत असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे, एकीकडे दैनंदिन रुग्णसंख्या नवे उच्चांक गाठत असताना मृतांची संख्याही चिंतेचा विषय ठरत आहे. देशात गेल्या २४ तासात दोन हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार ५५३ इतकी झाली आहे. तर रुग्णसंख्या १ कोटी ५६ लाख १६ हजार १३० वर पोहोचली आहे. देशात गेल्या २४ तासांत २ लाख ९५ हजार ४१ नवे करोना रुग्ण आढळले आहेत तर २०२३ जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत १ लाख ६७ हजार ४५७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत १ कोटी ३२ लाख ७६ हजार ३९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशात सध्याच्या घडीला २१ लाख ५७ हजार ५३८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. India reports 2,95,041 new #COVID19 cases, 2,023 deaths and 1,67,457 discharges in the last 24 hours, as per Union Health Ministry Total cases: 1,56,16,130 Total recoveries: 1,32,76,039 Death toll: 1,82,553 Active cases: 21,57,538 Total vaccination: 13,01,19,310 pic.twitter.com/YrLu5MVdbl — ANI (@ANI) April 21, 2021 करोनाचे सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात मंगळवारी ६२ हजार ९७ रुग्णांची नोंद झाली. यानंतर उत्तर प्रदेश (२९ हजार ५७४), दिल्ली (२८ हजार ३९५), कर्नाटक (२१ हजार ७९४)आणि केरळचा (१९ हजार ५७७) समावेश आहे. देशात गेल्या २४ तासांत नोंद झालेल्या रुग्णसंख्येत या पाच राज्यांचा मोठा वाटा आहे. ५४.७२ टक्के रुग्ण या पाच राज्यांमधील आहेत. तसंच २४ तासांत सर्वाधिक मृत्यू महाराष्ट्र (५१९) आणि दिल्लीत (२७७) झाले आहेत.