भारतात सलग पाचव्या दिवशी रुग्णसंख्येचा उच्चांक नोंदवण्यात आला आहे. भारतात गेल्या २४ तासांत साडे तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली असून दोन हजारांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे. भारताला करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला असून राज्यांना आरोग्य सुविधांची कमतरता जाणवत आहे. व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड्सचा तुटवडा जाणवत असताना अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. मात्र अद्यापही देशातील रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही.

भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख ५२ हजार ९९१ करोना रुग्ण आढळले असून यासोबत एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७३ लाख १३ हजार १६३ इतकी झाली आहे. तर २८१२ जणांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ लाख ९५ हजार १२३ जणांना करोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान गेल्या २४ तासांत २ लाख १९ हजार २७२ जण उपचारानंतर बरे झाले आहेत. आतापर्यंत १ कोटी ४३ लाख ४ हजार ३८२ जणांनी करोनावर मात केली आहे.

देशात सध्याच्या घडीला २८ लाख १३ हजार ६५८ अॅक्टिव्ह रुग्ण असून १४ कोटी १९ लाख ११ हजार २२३ जणांचा लसीकरण झालं आहे. १५ एप्रिलपासून भारतात दोन लांखाहून अधिक रुग्ण आढळत असून तीन लखांहून अधिक रुग्ण आणि दोन हजारांपेक्षा जास्त मृत्यू होण्याचा हा सलग पाचवा दिवस आहे.

सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात ६६ हजार १९१ रुग्णांची नोंद झाली आहे. यानंतर उत्तर प्रदेश (३५,३११), कर्नाटक (३४,८०४), केरळ (२८,४६९) आणि दिल्लीचा (२२,९३३) क्रमांक आहे.