भारतात गेल्या काही दिवसांपासून करोनाने कहर केला असून दैनंदिन रुग्णसंख्येने उच्चाकं गाठले आहेत. भारतात गेल्या आठवड्यापासून दैनंदिन रुग्णसंख्येत होणारी वाढ अद्यापही कायम असून गुरुवारी २४ तासांमध्ये तब्बल ३ लाख ७९ हजार २५७ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्याही चिंता वाढवणारी असून ३६४५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी देण्यात आली आहे.

देशात गेल्या २४ तासांत ३ लाख ७९ हजार २५७ नवे रुग्ण आढळल्याने रुग्णसंख्या १ कोटी ८३ लाख ७६ हजार ५२४ वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २ लाख ४ हजार ८३२ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत २ लाख ६९ हजार ५०७ जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत १ कोटी ५० लाख ८६ हजार ८७८ रुग्ण करोनातून बरे झाले आहेत.

देशात सध्याच्या घडीला ३० लाख८४ हजार ८१४ अॅक्टिव्ह रुग्ण असून १५ कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण झालं आहे.

महाराष्ट्रात २४ तासांत ९८५ मृत्यू, तर ६३ हजार ३०९ नवे करोनाबाधित!
महाराष्ट्रात बुधवारी २४ तासांत तब्बल ६३ हजार ३०९ नवे करोनाबाधित सापडले. त्यामुळे राज्यातल्या एकूण अॅक्टिव करोनाबाधित रुग्णांचा आकडा ६ लाख ७३ हजार ४८१ वर गेला आहे. तसेच, आजपर्यंत राज्यात करोनाची लागण झालेल्या व्यक्तींची संख्या देखील ४४ लाख ७३ हजार ३९४ इतकी झाली आहे.  दरम्यान २४ तासांमध्ये राज्यात ९८५ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. राज्यातील एकूण मृतांचा आकडा आता ६७ हजार २१४ इतका झाला आहे.