देशात गेल्या २४ तासांत २२, ७७१ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. करोना रुग्णांच्या संख्येत एकाच दिवसात झालेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. रुग्णांच्या झपाट्याने वाढत असलेल्या नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. शिवाय दररोजच्या वाढत्या संख्येपुढे देशातील आरोग्य यंत्रणा कशी पुरी पडणार, हा प्रश्न आता उभा ठाकला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६,४८,३१५ इतकी झाली आहे. यापैकी दोन लाख ३५ हजार ४३३ रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन लाख ९४ हजार २२७ जणांनी करोनावर मात केली आहे. गेल्या २४ तासांत देशात ४४२ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. आतापर्यंत देशभरात १८, ६५५ लोकांना करोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत. India reports 442 deaths and highest single-day spike of 22,771 new #COVID19 cases in the last 24 hours. Positive cases stand at 648315 including 235433 active cases, 394227 cured/discharged/migrated & 18655 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/qe3Dz7acHo — ANI (@ANI) July 4, 2020 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ६०.७२ टक्के झाले आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, दिल्ली, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि राजस्थानात करोना रुग्णांची संख्या अधिक आहे. बरे झालेल्या रुग्णांची संख्या उपचाराधीन रुग्णांपेक्षा १.५ लाखांनी जास्त आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये २ लाख ४२ हजार ५७६ नमुना चाचण्या झाल्या असून एकूण ९५ लाख ४० हजार ७४९ चाचण्या करण्यात आल्या. गेल्या चोवीस तासांमध्ये महाराष्ट्रात ६३२८, तमिळनाडूमध्ये ४३४३, दिल्ली २३७३ रुग्णांची वाढ झाली. दिल्लीतील करोना रुग्णांची संख्या ९० हजारांहून अधिक झाली असून ती ९२ हजार १७५ वर पोहोचली आहे. राजधानीतील रुग्ण वाढ लक्षात घेऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. दिल्लीत रक्तद्रव बँकही सुरू करण्यात आली आहे.