भारतात गेल्या २४ तासात ६३ हजार ५०९ नवे करोना रुग्ण आढळले असून ७३० जणांचा मृत्यू झाला आहे. यासोबत देशातील करोनाबाधित रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० वर पोहोचली आहे. देशात सद्या ८ लाख २६ हजार ८७६ अॅक्टिव्ह रुग्ण आहे. ६३ लाख १ हजार ९२८ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्याची संख्या १ लाख १० हजार ५८६ इतकी झाली आहे.

मंगळवारी ६० हजारापेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली होती. देशात सलग सहाव्या दिवशी ७५ हजारांपेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. महत्वाची बाब म्हणजे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्याही घटताना दिसत आहे. सलग १० व्या दिवशी एक हजारापेक्षा कमी मृत्यूंची नोंद झाली आहे.

१७ सप्टेंबरला भारतात सर्वाधिक ९७ हजार ८९४ रुग्णांची नोंद झाली होती. दरम्यान ७ ऑगस्टला भारताने २० लाख रुग्णसंख्येचा टप्पा ओलांडला होता. तर २३ ऑगस्टला ३० लाख आणि ५ सप्टेंबरला ४० लाखांच्या पुढे रुग्णसंख्या गेली होती. यानंतर १६ सप्टेंबरला ५० लाख, २८ सप्टेंबरला ६० लाख आणि ११ ऑक्टोबरला ७० लाख अशी रुग्णसंख्या वाढत गेली. सध्या एकूण रुग्णसंख्या ७२ लाख ३९ हजार ३९० इतकी आहे.