देशात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ चिंता वाढवणारी आहे. सलग दुसऱ्या दिवशी भारतात तीन लाखांहून अधिक करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात ३ लाख ३२ हजार ७३० करोना रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत देशात दैनंदिन रुग्णवाढीचा नवा जागतिक उच्चांक नोंदवण्यात आला आहे.

दिवसातील उच्चांकी वाढ
गेल्या २४ तासांमध्ये देशात देशात २ हजार २६३ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत करोनामुळे १ लाख ८६ हजार ९२० रुग्णाना करोनामुळे जीव गमवावा लागला आहे. भारत सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असून रुग्णसंख्या वाढीत भारताचा वेग सर्वाधिक आहे. ही बाब चिंताजनक असून यामुळे वैद्यकीय सेवांवर आणि आरोग्य सुविधांवरील ताण वाढत चालला आहे. गेल्या काही आठवड्यांपासून भारतात रुग्णसंख्येचा दर वाढत असून आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

दरम्यान देशात आतापर्यंत १ कोटी ३६ लाख ४८ हजार १५९ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर सध्याच्या घडीला २४ लाख २८ हजार ६१६ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

वाचा: धक्कादायक! दिल्लीत ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने २५ रुग्णांचा मृत्यू

बुधवारी देशात ३ लाख १४ हजार ८३५ रुग्ण संख्येची नोंद करण्यात आली होती. रुग्णसंख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ होती. मात्र शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ही ३ लाखांहून अधिक रुग्ण आढळून असून नव्या उच्चांकाची नोंद झाली. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून बुधवारी २६ हजार नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर ३०६ रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला आहे.

एकूण होणाऱ्या रुग्ण संख्या वाढीत ७५ टक्के रुग्ण हे महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या १० राज्यांमधील असल्याचं आरोग्य विभागाने नोंदवलं आहे. तर आतापर्यंत १३ कोटी ५३ हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं आहे.