देशात गेल्या २४ तासांत ३० हजार ७७३ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. शनिवारच्या रुग्णसंख्या तुलनेत जवळपास १३.७ टक्क्यांनी रुग्णसंख्या कमी झाली असून यामुळे देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरोग्य मंत्रालयाने ही आकडेवारी जाहीर केली आहे. यासोबत देशातील आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट २.४ टक्के झाला असून गेल्या ८६ दिवसांच्या तुलनेत तीन टक्क्यांनी कमी असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.

दरम्यान दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट १.९७ टक्के असून गेल्या २० दिवासंच्या तुलनेत तीन टक्क्यांपेक्षा कमी आहे. दरम्यान देशात गेल्या २४ तासात ३८ हजार ९४५ रुग्ण बरे झाले असून ३०९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात सध्याच्या घडीला ३ लाख ३२ हजार १५८ अॅक्टिव्ह रुग्ण असून एकूण रुग्णसंख्या ३ कोटी ३४ लाख ४८ हजार १६३ वर पोहोचली आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २६ लाख ७१ हजार १६७ रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून ४ लाख ४४ हजार ८३८ जणांनी प्राण गमावले आहेत. दरम्यान गेल्या २४ तासात ८५ लाख ४२ हजार ७३२ जणांचं लसीकरण झालं असून आतापर्यंत ८० कोटी ४३ लाख ७२ हजार ३३१ जणांनी लस घेतली आहे.

केरळ (१९,३२५), महाराष्ट्र (३३९१), तामिळनाडू (१६५३), आंध्रप्रदेश (११७४) आणि मिझोराम (११०४) या पाच राज्यांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळले आहेत. या पाच राज्यांमध्ये एकूण ८६.६ टक्के रुग्ण आढळले असून एकट्या केरळमधून ६२.८ टक्के रुग्ण आहेत. सर्वाधिक मृत्यूदेखील केरळमध्ये झाले असून यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक आहे. देशाचा रिकव्हरी रेट सध्या ९७.६८ टक्के असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे.