मानवी हक्क परिषदेच्या ४६ व्या सत्रात भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करणाऱ्या पाकिस्तान, टर्की आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनला भारताने मंगळवारी फटकारले. टर्कीने जम्मू-काश्मीरचा उल्लेख केला. त्यावर भारताने उत्तर देण्याच्या आपल्या अधिकारातंर्गत टर्कीला भारताच्या अंतर्गत विषयांमध्ये मतप्रदर्शन करण्यापासून दूर राहण्याचा सल्ला दिला.

“भारताचे अविभाज्य अंग असलेल्या जम्मू-काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासंदर्भात OIC ने मांडलेला मुद्दा आम्ही फेटाळून लावतो. OIC ला भारताच्या अंतर्गत विषयात हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. पाकिस्तानच्या अजेंडयासाठी OIC स्वत:चा पाकिस्तानला गैरवापर करु देत आहे. पाकिस्तानला असे करु देणे स्वत:च्या हिताचे आहे का? याचा OIC ने विचार करावा” असे जीनेव्हामधील भारताच्या स्थायी मिशनचे प्रथम सचिव पवन बाथे आपल्या उत्तरात म्हणाले.

“आपल्या वाईट उद्देशांसाठी भारतावर खोटे आरोप करुन, बदनामी करण्याची पाकिस्तानची नेहमीची सवय आहे. पाकिस्तान तर संयुक्त राष्ट्राच्या निर्बंध यादीत नाव आलेल्या लोकांना पेन्शन देतो. त्यांचे पंतप्रधान तर जम्मू-काश्मीरमध्ये लढण्यासाठी हजारो दहशतवाद्यांना प्रशिक्षण देत असल्याचे अभिमानाने मान्य करतात” अशा शब्दात पवन बाथे यांनी मानवी हक्क परिषदेच्या सत्रात पाकिस्तानवर टीका केली.