भारताने अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम असलेल्या K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. आंध्र प्रदेशच्या किनाऱ्याजवळ रविवारी ही चाचणी करण्यात आली. या क्षेपणास्त्राची मारक क्षमता ३,५०० किलोमीटर आहे.

समुद्रात पाण्याखालून K-4 क्षेपणास्त्र डागण्यात आले. पाणबुडीमधूनही हे क्षेपणास्त्र डागता येऊ शकते. अरिहंत वर्गाच्या अण्वस्त्र पाणबुडयांवर या क्षेपणास्त्राची तैनाती करण्यात येईल. अरिहंत ही स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) K-4 क्षेपणास्त्र विकसित केले आहे.

काय आहे K-4 क्षेपणास्त्राचे वैशिष्टय

– भारत आपल्या पाणबुडयांच्या ताफ्यासाठी पाण्याखालून हल्ला करु शकणारी दोन क्षेपणास्त्रे विकसित करत आहे. K-4 त्यापैकी एक आहे. K-4 ची मारक क्षमता ३,५०० किलोमीटर आहे तर दुसऱ्या क्षेपणास्त्राची रेंज ७०० किलोमीटर आहे.

– तीन मीटर लांब क्षेपणास्त्र एक टनापर्यंत अण्वस्त्र वाहून नेऊ शकते.

– पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता खूप महत्वपूर्ण आहे. यामुळे भारत आता हवा, जमीन आणि पाण्याखालूनही अण्वस्त्र हल्ला करण्यास सक्षम झाला आहे.

– आतापर्यंत फक्त अमेरिका, रशिया आणि चीनकडे पाणबुडीमधून बॅलेस्टिक क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता होती. भारताचा आता या देशांच्या पंक्तीत समावेश झाला आहे.

– अण्वस्त्र पाणबुडयांवर K-4 क्षेपणास्त्राची तैनाती करण्याआधी डीआरडीओकडून या क्षेपणास्त्राच्या आणखी चाचण्या करण्यात येतील. सध्या भारतीय नौदलाची आयएनएस अरिहंत ही अण्वस्त्र पाणबुडी कार्यरत आहे.