भारतीय हवाई दलातील मिराज २००० या लढाऊ विमानांनी मंगळवारी पहाटे पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहे. या तळांवर जैश- ए- मोहम्मदच्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिले जात होते. या तळांचा वापर करुन भारतात आणखी आत्मघातकी हल्ला करण्याचा कट असल्यानेच बालाकोट येथे कारवाई केल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव विजय गोखले यांनी स्पष्ट केले आहे. २१ मिनिटांमध्ये हवाई दलाच्या विमानांनी ही कारवाई केली असून ही कारवाई नेमकी कुठे करण्यात आली, याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पहाटे ३. ४५ ते ४.०४ दरम्यान नेमके काय झाले ? 'द प्रिंट'ला संरक्षण दलातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारताच्या विमानांनी २१ मिनिटे कारवाई केली आहे. यातील पहिला हवाई हल्ला ३ वाजून ४५ मिनिटांनी झाल्याचे समजते. खैबर पख्तुनवा प्रांतातील बालाकोट येथे पहाटे पावणे चार ते ३ वाजून ५३ मिनिटांपर्यंत हवाई दलाने बॉम्ब हल्ला केला. बालाकोटमधील जैश- ए- मोहम्मद, लष्कर- ए- तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन यांच्या संयुक्त प्रशिक्षण तळांवर हा हवाई हल्ला करण्यात आला. बालाकोटनंतर पहाटे ३. ४८ ते ३. ५५ अशी सात मिनिटे मुझफ्फराबाद येथे कारवाई करण्यात आली. यानंतर चाकोटी येथे पहाटे ३.५८ ते ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत हल्ला करण्यात आला. पाकिस्तानचे म्हणणे काय ? पाकिस्तानचे मेजर जनरल गुफूर यांनी भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून बॉम्बहल्ला केल्याचं मान्य केलं आहे, पण आमच्या विमानांनी भारतीय विमानांना तातडीने प्रत्युत्तर दिलं, त्यामुळे घाईघाईत भारतीय विमानांनी निर्जन ठिकाणी बॉम्ब टाकले आणि परत फिरले असा दावा गफूर यांनी केला आहे.