भारताची अमेरिकेला विनंती नवी दिल्ली : अमेरिकेने आपल्या एच१बी व्हिसा धोरणामध्ये काही बदल प्रस्तावित केले असून त्याबाबत अमेरिकेने संतुलित आणि संवेदनक्षम भूमिका घ्यावी, अशी विनंती भारताने गुरुवारी अमेरिकेला केली. दोन्ही देशांमधील संबंध वृद्धिंगत होण्यासाठी जनतेचे एकमेकांशी असलेले संबंध महत्त्वाचे असून नव्या धोरणामुळे त्या संबंधांना बाधा निर्माण होऊ शकते, असे भारताने म्हटले आहे. एच१बी व्हिसा धोरणामध्ये संतुलित आणि संवेदनक्षम भूमिका घ्यावी, अशी विनंती आपण अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पिओ यांना केल्याचे परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी येथे एका संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील मैत्री पाहता अमेरिका दोन्ही देशांच्या हिताविरुद्ध कोणतेही पाऊल उचलणार नाही, असे भारतीयांना वाटते, असेही त्या म्हणाल्या. पाकिस्तानला खडे बोल दोन अधिक दोन चर्चेच्या वेळी सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाला पाकिस्तानचे समर्थन असून पाकिस्तानच्या या धोरणाविरुद्ध अमेरिकेने उचललेले पाऊस स्वागतार्ह आहे, असेही स्वराज यांनी म्हटले आहे.