हवामान बदल हे एक प्रकारचे सुनिश्चित आव्हान असून त्याचा मुकाबला करण्यासाठी संयुक्त कार्यकारी गट नेमण्याचा निर्णय अमेरिका व भारत यांनी येथे घेतला आहे.पंतप्रधान मनमोहन सिंग व अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी २०२० नंतरच्या काळासाठी एका हवामान कराराचा आराखडा तयार करण्यासाठी एक कार्यकारी गट नेमण्याचा निर्णय जाहीर केला आहे. दोन्ही देशात हवामान बदलविषयक मुद्दय़ावर सहकार्य करण्यावरही भर देण्यात आला आहे.हवामान बदल हा महत्त्वाचा मुद्दा असून तो आव्हानात्मक आहे, त्यावर दोन्ही देशात सहकार्य करण्याची गरज आहे त्यामुळे भारत-अमेरिका हवामान बदलविषयक कार्यकारी गट स्थापन करण्यात येत असल्याचे संयुक्त निवेदनात म्हटले आहे.उभय देशांच्या नेत्यांनी हायड्रोफ्लुरो कार्बन्सचे प्रमाण कमी करण्यासाठी भारत-अमेरिका कामकाज गटाची तातडीने बैठक बोलावण्याचे यावेळी ठरवले आहे. माँट्रियल करारानुसार हायड्रोफ्लुरो कार्बन्स कमी करणे गरजेचे आहे. युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कनव्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज या जाहीरनाम्यात तसेच क्योटो जाहीरनाम्यात हायड्रोफ्लुरो कार्बन्सचा समावेश करण्याचे दोन्ही देशांनी ठरवले आहे. क्योटो जाहीरनामा मान्य करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून करीत असलेल्या प्रयत्नांचे दोन्ही नेत्यांनी स्वागत केले असून २०१५ पर्यंत फ्रान्समध्ये होणाऱ्या सीओपी २१ परिषदेपूर्वी त्याची अंमलबजावणी करण्याचे ठरवले आहे.