पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

भारताला जगातील तिसरी व १० लाख कोटी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याचा सरकारचा इरादा असून देशात असंख्य स्टार्ट अप, विद्युत वाहनांचा जास्त वापर असलेला देश बनवण्याचे आपले स्वप्न आहे. पूर्वीच्या सरकारच्या काळात मंत्रालयांमध्ये भ्रष्टाचारासाठी स्पर्धा होती; आता कार्यक्षमतेसाठी आहे , असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

ग्लोबल बिझिनेस शिखर बैठकीत त्यांनी सांगितले, की आम्हाला लकवा असलेली अर्थव्यवस्था मागील सरकारकडून वारशाने मिळाली. त्यात चलनवाढ होती, तसेच चालू खात्यावरील तूट वाढलेली होती. गेल्या चार वर्षांत आम्ही चित्र बदलून टाकले असून बदल आता समोर दिसत आहेत.

ते म्हणाले की, भाजपप्रणीत एनडीए सरकारने ७.४ टक्के विकास दर संपादन केला असून चलनवाढही ४.५ टक्कय़ांपेक्षा कमी आहे. वस्तू व सेवा कर सुधारणेमुळे एकूण राष्ट्रीय उत्पन्नात भर पडली आहे. देशातील १३० कोटी लोकांच्या आशाआकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार नवभारताची निर्मिती करीत असून आगामी काळातील आव्हाने पेलण्यास सज्ज आहोत. काँग्रेसच्या काळात आपण काहीच करू शकत नाही अशी भावना लोकांमध्ये होती. आता आपण सर्व काही करू शकतो अशी भावना देशात आहे. भारत आता मंगळावर माणूस पाठवण्याचा विचार करीत आहे. प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर छप्पर असावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतात १०० स्मार्ट शहरे उभी राहात आहेत. १०० महत्त्वाकांक्षी जिल्ह्यंची प्रगती वेगान होते आहे. देशात वेगवान रेल्वेगाडी तयार करण्यात आली आहे, देशातील कोटय़वधी लोकांना वीज मिळाली असून आपला देश विजेचा निर्यातदार झाला आहे. देशातील लोकांमुळेच अशक्य ते शक्य झाले आहे.