आज (मंगळवार) भारतीय हवाई दलाचा 87 वा स्थापना दिवस. 8 ऑक्टोबर 1932 रोजी भारतीय हवाई दलाचा पाया रचला गेला. सुरूवातीला हवाई दलाच्या ताफ्यात 4 वेस्टलँड बायप्लेन्स आणि 5 भारतीय वैमानिकांचा समावेश करण्यात आला होता. आज हवाई दलाच्या ताफ्यात 1 हजार 720 पेक्षा अधिक लढाऊ विमानं आणि 1 लाख 70 हजारांच्यावर सैनिक देशसेवेत रूजू आहेत. हवाई दलाने आपले सामर्थ्य दाखविलेले त्या दहा मोठ्या प्रसंगांबद्दल जाणून घेऊया. 1. दुसरं जागतिक युद्ध: जपानच्या सैन्याला थायलंडमध्ये रोखलं दुसऱ्या जागतिक युद्धात जपानचं सैन्य म्यानमारमध्ये शिरकाव करत होतं तेव्हा भारतीय हवाई दलानं त्यांना रोखलं होतं. यानंतर थायलंडमधील अराकानस माए हाँग सोन, चियांग माय आणि चियांग राय बेसवरील जपानी सैन्याला परतवलं होतं. या युद्धात भारतीय हवाईदल ब्रिटिश आणि अमेरिकेच्या सैन्याची मदत करत होते. यामध्ये फ्लाइट लेफ्टनंट अर्जन सिंह यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. नंतर ते एअरफोर्स मार्शलदेखील झाले. 2. स्वातंत्र्यानंतर मदतकार्यात सहभाग फाळणीनंतर भारत आणि पाकिस्तान असे दोन देश तयार झाले. त्यावेळी हवाई दलाचीही दोन भागांमध्ये विभागणी झाली. त्यानंतर काही हल्लेखोरांनी जम्मू काश्मीरवर हल्ला केला. त्यांना पाकिस्तानचंही समर्थन होतं. दोन्ही देशांमध्ये अघोषित युद्ध सुरू होतं. त्यावेळी काश्मीरमधील जनतेला हवाईदलानं मदत केली होती. 3. काँगोमध्ये शांती प्रस्थापित; गोव्यालाही स्वातत्र्य मिळवून दिलं 1960 मध्ये काँगोमधून बेल्जिअमचं शासन संपलं. त्यानंतर काँगोमध्ये मोठ्याप्रमाणात हिंसाचार पसरला. हा हिंसाचार थांबवण्यासाठी भारतीय हवाई दलानं पाच स्क्वाड्रन काँगोला पाठवले होतं. त्यानंतर 1961 मध्ये पोर्तुगीजांना गोव्यातून हद्दपार करण्यासाठी हवाई दलाने ऑपरेशन विजय सुरू केलं होतं. 4. 1965: पाकिस्तानी सैन्याला धुळ चारली 1965 मध्ये पाकिस्तानने जम्मू काश्मीरसाठी पुन्हा एकदा भारतावर हल्ला केला. त्यावेळी पुन्हा एकदा भारतीय हवाईदलाने पाकिस्तानला धुळ चारली. यावेळी हवाई दलाने त्यांची अनेक लढाऊ विमानं पाडली. तर पाकिस्तानचे अनेक सैन्य तळही उद्ध्वस्त केले. 5. 1971: बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचं योगदान बांगलादेशला पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून देण्यास भारतीय हवाई दलानं महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. त्यावेळी पाकिस्ताननं राजस्थान, गुजरात आणि जम्मू काश्मीरमधून भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. परंतु यामध्ये हवाई दलानं पाकिस्तानच्या 94 विमानांना ध्वस्त केलं होतं. 6. 1984: ऑपरेशन मेघदूत भारतीय हवाई दलाच्या मदतीने भारतीय लष्कराने 13 एप्रिल 1984 रोजी ऑपरेशन मेघदूत अंतर्गत सियाचीनवर हल्ला केला. यानंतर पूर्ण सियाचीन ग्लेशिअर भारताच्या ताब्यात आला. जवळपास 3 हजार चौरस किलोमीटरचे क्षेत्र भारताच्या ताब्यात आलं. 7. श्रीलंकेतील ऑपरेशन पूमलाई श्रीलंकेत सुरू झालेल्या सिविल वॉरनंतर श्रीलंकेच्या सरकारने भारताकडे मदत मागितली होती. त्यानंतर भारतानं ऑपरेशन पूमलाई सुरू केलं. तामिळ बंडखोरांपासून श्रीलंकेतील नागरिकांना मदत आणि दिलासा देण्यासाठी ऑपरेशन पूमलाई सुरू करण्यात आलं होतं. आणखी वाचा : भारतीय हवाई दल वर्धापनदिन: या १५ गोष्टी वाचून तुम्हाला IAF चा अभिमान वाटेल 8. 1988: मालदीववरील हल्ला रोखला मालदीववर शसस्त्र गुन्हेगारांनी ताबा मिळवला असल्यानं मालदीवचे राष्ट्राध्यक्ष गयूम यांनी भारताकडे मदत मागितली होती. त्यानंतर 3 नोव्हेंबर 1988 रोजी भारतीय हवाईदलाने मालदीवची राजधानी मालेवर 4 मिराज फायटर जेट आणि आयएल-76 उतरवले होते. भारतीय हवाई दलाच्या पॅराट्रूपर्सनी माले विमानतळ हल्लेखोरांपासून सुरक्षित केसं तसंच त्यांना कंठस्नान घातलं. या मिशनला ऑपरेशन कॅक्टस हे नाव देण्यात आलं होतं. 9. 1999 कारगिल युद्ध कारगिल युद्धात लष्कराने भारतीय हवाई दलाकडे मदत मागितली होती. त्यानंतर हवाईदलाच्या लढाऊ विमानांनी आणि हेलिकॉप्टर्सनी कारगिलवर हल्ला केला. परंतु यामध्ये भारताचे दोन फायटर जेट आणि एक हेलिकॉप्टर मिसाईल हल्ल्यात पाडण्यात आले होते.. यानंतर हवाई दलानं आपली रणनीती बदलली. त्यानंतर मिराज आणि मिग-29 च्या सहाय्याने पाकिस्तानी घुसखोरांच्या ठिकाणांवर हल्ला सुरू केला. 26 जुलै रोजी भारताला मोठा विजय मिळाला. 10. बालाकोटमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला 14 फेब्रुवारी 2019 रोजी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यांनी पुलवामामध्ये आत्मघातकी हल्ला केला. यामध्ये सीआरपीएफचे जवान शहीद झाले होते. यानंतर हवाई दलाने 15 दिवसांमध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट. चकोठी, मुजफ्फराबादमधील दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते.