भारतीय हवाई दलाचे एएन -32 हे विमान सोमवारी दुपारी एक वाजता बेपत्ता झाले. या विमानाने दुपारी 12.25 मिनिटांनी आसाममधील जोरहाट हवाई तळावरून अरुणाचल प्रदेशमधील अॅडवांस लँडिंग ग्राउंड मेचुकासाठी उड्डाण घेतले होते. दुपारी एकच्या सुमारास या विमानाचा नियंत्रण कक्षाशी अखेरचा संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर या विमानाचा संपर्क होऊ शकला नाही. तपासपथकांनी तात्काळ शोधकार्यास सुरूवात केली असून रात्री उशिरापर्यंत विमानाचे अवशेष सापडले नव्हते. या विमानात एकूण १३ जण होते.

दुपारी एक वाजल्यापासून एएन -32 हे विमान बेपत्ता झाले होते, त्यानंतर तपासपथकांनी शोधकार्य सुरू केले. या विमानात आठ 8 कर्मचारी आणि 5 प्रवासी असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हवाई दलाने सुखोई-30 आणि सी-130 स्पेशल ऑप्स विमाने शोधमोहिमेसाठी रवाना केली आहेत.

दरम्यान, हवाई दलाचे हे विमान दुपारी 1.30 वाजता मेचुका येथे पोहोचणार होते. परंतु ते ठरलेल्या वेळेत ते या ठिकाणी पोहोचले नाही. आम्ही सध्या शोधमोहिम सुरू केली आहे, अशी माहिती हवाई दलाचे जनसंपर्क अधिकारी कमांडर रत्नाकर सिंग यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले. तसेच सैन्यदलाला आणि आयटीबीपीलाही शोध मोहिमेसाठी रवाना करण्यात आले आहे. मेचुका अॅडव्हान्स लँडिंग ग्राउंड अरुणाचल प्रदेशच्या पश्चिम सिआंग जिल्ह्यातील मेचुका व्हॅलीमध्ये आहे. मॅकमोहन रेषेवळील भारत-चीन सीमेवरील हे सर्वात जवळचे लँडिंग ग्राउंड आहे.

यापूर्वीही 2016 मध्ये चेन्नईवरून पोर्ट ब्लेअरला जाणारे AN-32 विमान बेपत्ता झाले होते. यामध्ये हवाई दलाचे 12 जवान, 6 कर्मचारी, 1 नौदलाचा जवान, 1 सैन्यदलाचा जवान आणि एका कुटुंबातील 8 सदस्य होते. 1 पाणबुडी, 8 विमाने आणि 13 युद्धनौकांच्या मदतीने या विमानाचा शोध घेण्यात आला होता. यानंतरही या विमानाबद्दल माहिती मिळाली नव्हती.