भारताने सोमवारी पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर कारवाई केली आहे. भारताने सात दहशतवादी तळांना लक्ष्य केले. या कारवाईत ५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. रिपब्लिक वाहिनीने लष्करातील वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. पाकिस्तानच्या बॅट कमांडो फोर्सच्या सात एसएसजी कमांडोंनी तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या हद्दीत या कमांडोंचे मृतदेह पडलेले आहेत. पाकिस्तानने अजूनही या मृतदेहांवर दावा केलेला नाही. नियंत्रण रेषेवर भारताच्या बोफोर्स तोफांचे अक्षरक्ष: तांडव सुरु आहे. बोफोर्स तोफांमधून जवळपास ३ हजार तोफगोळे डागण्यात आल्याचा सूत्रांचा दावा आहे. सात पैकी पीओकेमध्ये ३० किलोमीटर आत असणाऱ्या दोन तळांवर अचूकतेने प्रहार करण्यात आला.

भारताच्या तोफ गोळयांच्या वर्षावामध्ये पीओकेमधील नीलम-झेलम हायड्रोपावर प्रकल्पाच्या तीन नंबर गेटचेही नुकसान झाले आहे. रविवारी सुद्धा भारतीय लष्कराने पीओकेमधील चार दहशतवादी तळ उडवले होते. त्यामध्ये पाच ते दहा दहशतवादी आणि तितकेच सैनिक ठार झाल्याचा दावा भारतीय लष्कराने केला होता. तंगधारमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारताने प्रत्युत्तरादाखल इतकी मोठी कारवाई केली होती. सोमवारच्या भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने तातडीची बैठक बोलवली होती.