जम्मू- काश्मीरमधील राजौरी आणि पूँछ या भागात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारतीय जवानांनी केलेल्या गोळीबारात पाकिस्तानच्या सैन्यातील पाच सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून या वृत्ताला पाकिस्तानी सैन्याने अद्याप दुजोरा दिलेला नाही.

नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याच्या घटना वाढल्या आहेत. भारतीय जवानांनीही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले असून भारतीय सैन्याच्या प्रत्युत्तरात पाकच्या पाच सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या वृत्ताला पाकिस्तानी सैन्याने अद्याप दुजोरा दिलेला नाही. तर भारतीय सैन्यानेही या वृत्तावर प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, गेल्या आठवड्यात शुक्रवारी नियंत्रण रेषेजवळ दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात भारतीय सैन्यातील दोन जवान शहीद झाले होते. यात पुण्यातील मेजर शशिधरन विजय नायर यांचा समावेश होता. नियंत्रण रेषेजवळ गस्त घालणाऱ्या सैन्याच्या पथकाला लक्ष्य करण्यासाठीच आयईडी बॉम्ब पेरण्यात आले होते.