पाकिस्तानातील भारतीय दूतावासाभोवतालच्या बंदोबस्तात गुरुवारी मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. मुंबई हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब याला फाशी दिल्याच्या पाश्र्वभूमीवर भारताच्या विनंतीवरून हे पाऊल उचलण्यात आले आहे.
कसाबला बुधवारी फासावर लटकाविण्यात आले. त्याआधी मंगळवारी भारताचे पाकिस्तानातील उपउच्चायुक्त गोपाळ बागले यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयातील दक्षिण आशिया विभागाचे महासंचालक जोहरा अकबरी यांची भेट घेतली.
कसाबच्या फाशीची माहिती देणारे पत्र त्यांनी अकबरी यांना दिले तसेच त्याची प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटण्याची शक्यता असल्याने भारतीय दूतावासाला वाढीव बंदोबस्त पुरविण्याची मागणीही केली.
पाकिस्तानातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, इस्लामाबादेतील भारतीय दूतावासाबाहेर पूर्वीपासूनच कडेकोट बंदोबस्त असतो. त्यात आता कमालीची वाढ झाली आहे.
कसाबच्या फाशीनंतर पाकिस्तानी तालिबान्यांनी जिथे दिसतील तिथे भारतीयांना टिपण्याचे फर्मान सोडले आहे. २०१० मध्ये तालिबान्यांच्या दोन हस्तकांना अटक झाली होती तेव्हा भारतीय परराष्ट्र अधिकाऱ्यांविरोधातील कट उघडकीस आला होता.
 भारतीय राजदूतांसह कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांच्या बदल्यात पाकिस्तानी तुरुंगातील अतिरेक्यांची सुटका करण्याचा कट त्यांनी आखला होता.
तर गंभीर परिणाम
दरम्यान, संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मोहम्मद अफजल गुरूला फाशी देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यास संपूर्ण भारताला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी ‘जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट’ ने दिली आहे. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी जिवंत सापडलेल्या अजमल कसाबला कमालीची गोपनीयता राखत बुधवारी फाशी दिल्यानंतर देशभरात या निर्णयाचे स्वागत झाले. मात्र कसाबला फाशी देण्यापूर्वी संसदेवर हल्ला करणाऱ्या अफजल गुरूला फासावर चढवणे गरजेचे होते, असे मत भाजप व काँग्रेसमधील काही नेत्यांनी व्यक्त केले. या पाश्र्वभूमीवर जेकेएलएफचा प्रमुख मोहम्मद यासिन मलिक यांनी ही धमकी दिली. आमच्या संघटनेचे संस्थापक मोहम्मद मकबूल भट यांना सरकारने फाशी दिली, मात्र या चुकीची पुनरावृत्ती झाल्यास देशभरात त्याचे गंभीर पडसाद उमटतील, अशी गर्भित धमकी मलिक याने दिली.