रोजगार, नोटाबंदी आणि जीएसटीच्या आघाडीवर सरकार अपयशी ठरल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत असताना एशियन डेव्हलपमेंट बँकेने सरकारला दिलासा देणारी बातमी दिली आहे. आर्थिक आघाडीवर मोदी सरकार चांगली कामगिरी करत असल्याची पावती एशियन बँकेने दिली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था भक्कमपणे विकासाच्या वाटेवरुन मार्गक्रमण करत आहे. चालू वित्तीय वर्षात आर्थिक विकास दर ७.३ टक्के राहिल असे एशियन बँकेने म्हटले आहे. रुपयाचे अवमूल्यन आणि बाहेरील वित्तीय बाजारपेठेतील अस्थितरता यांचे अर्थव्यवस्थेसमोर मुख्य आव्हान असल्याचे बँकेने आपल्या अहवालात म्हटले आहे.

देशांतर्गत मागणीमुळे विकसनशील आशियामध्ये आर्थिक विकास स्थिर राहिल असे म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्था भक्कम आहे. चालू वर्षात २०१८ मध्ये विकास दर ७.३ टक्के राहिल. त्यानंतर २०१९ मध्ये विकास दर ७.६ टक्के राहिले असे भाकीत एशियन बँकेने वर्तवले आहे. नोटाबंदी आणि जीएसटी या निर्णयांचा तात्पुरता परिणाम अपेक्षित होता पण आता त्यांचा प्रभाव ओसरला आहे असे बँकेने म्हटले आहे.