चिनी सैनिकांसोबत लडाखमधील गलवान व्हॅलीत निर्माण झालेल्या वादानंतर आता भारताने दक्षिण चीन समुद्रात आपली युद्धनौका तैनात केली आहे. भारताच्या या कृतीवर चिनी नौदलाने आक्षेप नोंदवला असून दोन्ही देशांदरम्यान सुरु असलेल्या चर्चेदरम्यान भारताच्या या कृतीवर चीनने नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, चीनच्या कुठल्याही कृतींवर अंकुश ठेवण्यासाठी भारताने घेतलेला हा आक्रमक पवित्रा मानला जात आहे. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.

दक्षिण चीन समुद्रात चीनने २००९ पासून कृत्रीम बेटं निर्माण करीत आणि समुद्रात आपलं सैन्य तैनात करीत कार्यक्षेत्र विस्तारण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. त्यामुळे चीनचे शेजारील देशांशी वाद निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर चीनच्या या कृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अमेरिकेने नुकतेच दक्षिण चीन समुद्रात आपल्या युद्धनौका तैनात केल्या आहेत. त्यामुळे या भागात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यानंतर आता भारतानेही आपली युद्धनौका या भागात तैनात केली आहे.

जूनमध्ये गलवान खोऱ्यात चिनी सैनिकांसोबत निर्माण झालेल्या वादामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. त्यानंतर चीनच्या हरकती रोखण्यासाठी भारतीय नौदलानं आपली युद्धनौका दक्षिण चीनच्या समुद्रात पाठवली. यावर चीनच्या पिपुल्स लिबरेशन आर्मीच्या नौदलानं आक्षेप घेतला आहे. या समुद्रातील सर्वाधिक भाग हा आमच्या नियंत्रणाखाली असल्याचा दावा चीनकडून केला जात असून अन्य देशांच्या जहाजांना आणि विमानांना या क्षेत्रात येण्यापासून रोखत आहे.

दक्षिण चिनी समुद्रात अमेरिकन आणि भारतीय नौदल एकमेकांच्या संपर्कात असल्याने चीनमध्ये देखील भीतीचे वातावरण आहे. त्याचबरोबर चीनच्या हरकतींना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतानं आपली युद्धनौका सज्ज ठेवली आहे.