तोटा सहन करणाऱ्या भारतीय रेल्वेने आपल्या कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींसह अर्थमंत्री अरूण जेटली, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री उपस्थित होते. या निर्णयाचा रेल्वेच्या १२.३० लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे.

उत्पादकतेवर देण्यात येणाऱ्या बोनससाठी वेतनाची मर्यादा ही ७ हजार रूपयाइतकी निश्चित करण्यात आली आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या बोनसपोटी १७९५१ रूपये मिळणार आहेत. कर्मचाऱ्यांना बोनसची ही रक्कम दसऱ्याच्या आत दिली जाण्याची शक्यता आहे. यामुळे रेल्वेवर २,२४,५४५ कोटी रूपयांचा बोजा पडणार आहे.