भारतीय रेल्वे कायमच आपल्या प्रवाशांना वेगवेगळ्या सुविधा देऊन खुश करत असते. त्यात आता आणखी एक भर पडली आहे. रामाशी निगडित असणाऱ्या धार्मिक स्थळांना भेटी देणे सोपे व्हावे यासाठी रेल्वे प्रशासन नवी रेल्वे सुरु करत आहे. विशेष म्हणजे या रेल्वेला रामायण एक्स्प्रेस असे नाव देण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी ही रेल्वे दिल्लीतील सफदरगंज रेल्वे स्थानकावरुन रवाना होईल. रेल्वेमंत्री पियूष गोयल या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. या रेल्वेतून एकावेळी ८०० प्रवासी प्रवास करु शकतात.

भारत आणि श्रीलंकेमधील रामाशी जोडलेल्या सर्व स्थळांना भेट द्यायची असेल तर १६ दिवसांचे पॅकेज आहे. यात भारत आणि श्रीलंकेतील सर्व महत्त्वपूर्ण स्थळांना भेट दिली जाईल. सुरुवातीला आयोध्या, हनुमान गढी, रामकोट आणि कनक भवन मंदिर या ठिकाणी रेल्वे जाईल. त्यानंतर रेल्वे नंदिग्राम, सीतामढी, जनकपुर, वाराणसी, प्रयाग श्रृंगवेरपुर, चित्रकूट, नाशिक, हंपी आणि रामेश्वर याठिकाणी जाईल. त्यानंतर ज्यांना श्रीलंकेतील रामाची स्थळे पाहायची आहेत त्यांना विमानाने त्याठिकाणी नेण्यात येईल. केवळ भारतात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना १५,१२० रुपये मोजावे लागतील. तर श्रीलंकेला जाण्यासाठी चेन्नईतून कोलंबोला जावे लागणार आहे. या प्रवाशांना ३६,९७० रुपये जादाचे भरावे लागतील.

श्रीलंकेत ५ रात्री आण ६ दिवस राहता येणार आहे. याठिकाणी कँडी, नुवारा एलिया, कोलंबो, नेगोंबो येथे रामायण काळातील जोडल्या गेलेल्या स्थळांचे दर्शन घेता येणार आहे. या संपूर्ण पॅकेजमध्ये जेवणाची आणि राहण्याची सुविधा करण्यात आली आहे. तुम्हाला तिकीट आरक्षित करायचे असल्यास आयआरसीटीसीच्या (irctc)साईटवरुन करु शकता. याशिवाय देशात असलेल्या आयआरसीटीसीच्या २७ सुविधा केंद्रांमध्येही हे आरक्षण करता येईल.