रेल्वे अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अपघातांचे प्रमाण वाढत असतानाही रेल्वे प्रशासन मात्र ढिम्म असल्याचे दिसून येतेय. आज पंजाबमधील अमृतसर येथे रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना भरधाव रेल्वेने उडवल्याने झालेल्या अपघातात ६० जणांचा मृत्यू झाला आहे. रेल्वेच्या अपघातामध्ये आतापर्यंत खूप जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आपण नेहमी वृत्तपत्रांमधून रेल्वेच्या अपघाताच्या घटना वाचतच असतो. आज आम्ही तुम्हाला भारतातील सर्वात मोठ्या दहा रेल्वे अपघाताविषयी सांगणार आहोत, ज्यामध्ये खूप लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

  • ६ जून १९८१रोजी बिहारमध्ये मानसी जंक्शनपासून सहरसा जंक्शनला जाणारी रेल्वे बागमती नदीच्या पुलावरून कोसळली. यामध्ये सरकारी आकड्यानुसार ६०० जणांचा मृत्यू झाला आहे. पण पाण्यातून २५० मृतदेहच काढू शकले. ३०० पेक्षा जास्त लोकांचा आजपर्यंत काहीही थांगपत्ता लागलेला नाही. शेकडो लोक नदीमध्ये वाहुन गेले. हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा रेल्वे अपघात आहे आणि जगातील दुसरा मोठा रेल्वे अपघात आहे.
  • २० ऑगस्ट १९९५ रोजी भुवनेश्वर-दिल्ली पुरषोत्तम एक्स्पेसने उत्तरप्रदेशमधील फिरोजाबाद येथे कालिंदी एक्स्प्रेसला धडक दिल्यामुळे मोठा अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये ३५८ जणांचा मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते.
  • २ ऑगस्ट १९९९ रोजी आसामध्ये झालेल्या रेल्वे अपघातामध्ये २९० जणांचा मृत्यू झाला होता. आसाम एक्स्प्रेस आणि ब्रह्मपुत्र मेलचा गौसल स्टेशनवर अपघात झाला होता. या अपघातामध्ये लष्काराचे काही जवानांचाही मृत्यू झाला होता.
  • २६ नोव्हेंबर १९९८ रोजी पंजाबमध्ये जम्मू तवी एक्सप्रेस आणि गोल्डन टेम्पल मेलच्या अपघातामध्ये २१२ जणांचा मृत्यू झाला होता. जम्मू तवी एक्सप्रेसने गोल्डन टेम्पल मेलला धडक दिली होती.
  • २८ मे २०१० रोजी हावड़ा कुर्ला लोकमान्य टिळक एक्स्प्रेसला पश्चिम बंगालमध्ये भीषण अपघात झाला होता. रेल्वे रूळाला तडे गेल्यामुळे झालेल्या अपघातामध्ये १७० जणांचा मृत्यू झाला होता.
  • २३ डिसेंबर १९६४ रोजी धनुषकोडी पॅसेंजर सिलीकॉनच्या वादळाच्या तडाख्यात अडकली. या दुर्घटनेमध्ये १५० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
  • ९ सप्टेंबर २००२ रोजी बिहारमधील रफिगंज स्थानकाजवळ हावडा-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला भीषण अपघात झाला होता. पावसात रेल्वेरूळ विस्कळीत झाल्यामुळे हा अपघात झाला होता. या अपघातामध्ये १४० प्रवाशांचा मृत्यू झाला होता.
  • २८ सप्टेंबर १९५४ रोजी हैदराबादमध्ये झालेल्या भीषण रेल्वे अपघातामध्ये १३९ प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला. नदीमध्ये रेल्वे कोसळल्यामुळे हा अपघात झाला होता.
  • २ सप्टेंबर १९५६ रोजी पुलाचा काही भाग कोसळल्यामुळे झालेल्या अपघातात १२५ जणांचा मृत्यू झाला होता. हैदराबादपासून १०० किमी दूर अशलेल्या मेहबुबनगर पुलावर हा अपघात झाला होता.
  • १७ जुलै १९३७ रोजी झालेल्या रेल्वे अपघातात ११९ जणांचा मृत्यू झाला होता. स्वातंत्र्यपूर्वी झालेला रेल्वेचा हा सर्वात मोठा अपघात आहे. कोलकातामध्ये हा अपघात झाला होता.