जागातील इतर देशांच्या तुलनेत करोनाच्या संसर्गात भारत वेगाने पुढे जात असल्याने निर्माण झालेली चिंतेच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन दिवसांत ९०,००० रुग्ण बरे झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. या सलग तीन दिवसांच्या आकडेवारीमुळं भारताचा रुग्ण बरे होण्याचा दर हा ८० टक्क्यांच्या पुढे गेला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.

मंत्रालयानं म्हटलं, भारतानं एक महत्वाचा टप्पा ओलांडला असून देशाचा राष्ट्रीय करोना रिकव्हरी रेट हा ८० टक्क्यांच्यापुढे गेला आहे. देशात मोठ्या प्रमाणावर रुग्ण बरे होत आहेत. गेल्या तीन दिवसांत भारतात ९०,००० पेक्षा जास्त करोनाचे रुग्ण बरे झाले आहेत. १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील रिकव्हरी रेट हा सरासरीपेक्षा अधिक आहे. तर उर्वरित १० राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील रिकव्हरी रेट ७९ टक्के आहे. आज एकूण बरे झालेले रुग्ण ४४ लाखांच्या (४३,९६,३९९) जवळपास आहेत. त्यामुळे जगातील एकूण बरे होण्याऱ्या रुग्णांच्या संख्येत भारत अव्वल स्थानी आहे. जगातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ही आकडेवारी १९ टक्क्यांहून अधिक आहे.

भारतानं पार केला ५४ लाख रुग्णसंख्येचा टप्पा, मृतांची संख्या ८७,८८२वर

करोना महामारीचा फटका बसलेला भारत हा जगातील दुसरा देश आहे. देशात सोमवारी ८६,९६१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या ५४,८७,५८०वर पोहोचली आहे.

महाराष्ट्र अद्यापही मोठं बाधित राज्य

देशात महाराष्ट्राला सर्वाधिक करोनाचा फटका बसला आहे. राज्यात सध्या २,९७,८६६ अॅक्टिव्ह रुग्ण असून आजवर ३२,२१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर कर्नाटक हे दुसरं सर्वाधिक फटका बसलेलं राज्य आहे. या राज्यात सध्या ९८,५८३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आंध्र प्रदेश असून या राज्यात सध्या ८१,७६३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.