भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही अस्वाभाविक आहे. वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू केल्यामुळे दिसणारे हे तात्पुरते परिणाम आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये ही संपूर्ण मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. वस्तू आणि सेवा कर लागू केल्याने भारतात अनेक सकारात्मक बदल होतील असेही जागतिक बँकेचे अध्यक्ष जिम योंग किम यांनी सांगितले. जीएसटी लागू केल्यानंतरच्या पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा आलेख खालावल्याचे दिसून आले. याकडे नकारात्मक दृष्टीने पाहू नका, येत्या काळात हा आलेख नक्कीच उंचावेल असा विश्वास किम यांनी व्यक्त केला.

अर्थव्यवस्थेच्या अधोगतीवरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यावर सातत्याने टीका होते आहे. अशात वर्ल्ड बँकेतर्फे करण्यात आलेले वक्तव्य निश्चितच आशादायी आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील व्यापाराला चालना मिळावी यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांचे फळ देशाला नक्की मिळेल, असेही किम यांनी स्पष्ट केले. पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध प्रश्नांना उत्तरे दिली. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली एक शिष्टमंडळ आपल्या भेटीसाठी पुढील आठवड्यात येत असल्याची माहितीही किम यांनी दिली.

जागतिक अर्थव्यवस्थेने वेग पकडायला सुरूवात केलेय, व्यापारही वाढतो आहे. मात्र, गुंतवणुकीचे प्रमाण कमी झाले आहे, ही बाब काहीशी निराशाजनक आहे. काही धोरणांमध्ये अनिश्चितता आहे, असेही किम यांनी स्पष्ट केले. जगातील सगळ्याच देशांनी अर्थव्यवस्थेतील सुधारणांवर काम करणे आवश्यक आहे. तसेच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह निर्माण करण्याची आणि नवे गुंतवणूकदार तयार करण्याचीही आवश्यकता आहे. कोणतीही नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि रोगराई यांसारख्या संकटांमुळे काही आव्हाने उभी राहू शकतात. मात्र, त्यांच्याशी संघर्ष करून जागतिक अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सगळ्याच देशांनी प्रयत्नशील असले पाहिजे, असेही किम यांनी म्हटले.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदेशी गुंतवणूकदारांनी भारतात गुंतवणूक करावी, यासाठी प्रयत्न करत आहेत. असे असले तरीही भारतापुढे सध्या अनेक आव्हाने आहेत. निरक्षरता ही भारतातील एक मोठी समस्या आहे. तसेच आरोग्यविषयक आव्हानांनाही भारत तोंड देतो आहे. तरीही भारत इतर देशांप्रमाणे प्रगती करेल, यात शंका नाही असेही किम यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनहितासाठी काही कठोर निर्णय घेतले. त्यांनी सगळ्या देशाशी संवाद साधत जनतेच्या समस्या जाणून घ्यायचा प्रयत्न केला, ही बाब निश्चितच समाधानकारक असल्याचे किम यांनी सांगितले.