देपसांगमधील चीनची दादागिरी आणि पँगाँग टीएसओ तलाव क्षेत्राजवळच्या भागातून चीन मागे हटायला तयार नाहीय. त्यामुळे पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ पुन्हा एकदा तणाव वाढत चालला आहे. काल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलेला लडाख दौरा त्या दृष्टीनेच महत्त्वाचा आहे.

राजनाथ सिंह यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने भारतीय लष्कराने काल एकप्रकारे आपली तयारी दाखवून दिली. पॅरा कमांडोंजनी १६ हजार फूट उंचीवरुन पॅरा जम्पिंग करुन आपले कौशल्य दाखवून दिले तर भारताच्या टी-९० भीष्म रणगाडयांनी देखील आपली क्षमता दाखवून दिली.

मंगळवारी भारतीय आणि चिनी कंमाडर्समध्ये शेवटच्या फेरीची चर्चा झाली. त्यावेळी भारतीय लष्कराने चिनी सैन्य अधिकाऱ्यांना घुसखोरी केलेल्या पँगाँग टीएसओ परिसरातून मागे हटावेच लागेल, हे स्पष्ट केले आहे. पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेजवळ एप्रिलच्या मध्यमामध्ये जी स्थिती होती, तशी ‘जैसे थे’ परिस्थिती कायम करावीच लागेल, हे चिनी सैन्य अधिकाऱ्यांना ठामपणे सांगितले आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- चीनला इशारा; अंदमान-निकोबारमध्ये नौदलाच्या कवायती

मंगळवारी दोन्ही देशांच्या सैन्य अधिकाऱ्यांमध्ये विविध मुद्दायंवर प्रदीर्घ चर्चा झाली. तब्बल १५ तास ही बैठक चालली. चिनी सैन्याने घुसखोरी केलेल्या प्रदेशातून मागे फिरलेच पाहिजे, त्यावर कुठलीही तडजोड होणार नाही हे भारतीय सैन्याने चीनला स्पष्टपणे सांगितले आहे.

नियंत्रण रेषेजवळील देपसांगचा भागही आमच्या हद्दीमध्ये येतो असा चीनचा दावा आहे. तिथे सुद्धा चिनी सैन्यामुळे तणाव निर्माण झाला आहे. भारत आपल्या सैन्यबळाचा वापर करु शकतो, त्या दृष्टीने लष्करही सज्ज आहे हा अप्रत्यक्ष इशारा चीनला देण्यात आला आहे. पूर्व लडाखमधील परिस्थिती सुधारण्याची जास्तीत जास्त जबाबदारी आता चीनवर आहे असे सूत्रांनी सांगितले.

आणखी वाचा- भारताची एक इंचही जमीन सोडणार नाही : राजनाथ सिंह

‘भारताची एक इंचही जमीन सोडणार नाही’
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी लेहचा दौरा केला. यावेळी त्यांनी परिस्थितीचा आढावाही घेतला. त्यानंतर राजनाथ सिंह यांनी जवानांना संबोधित केलं. तसंच चीनलाही कठोर शब्दात इशारा दिला. “भारताच्या एक इंचही जमिनाला जगातील कोणतीही ताकद हात लावू शकणार नाही,” असं ते यावेळी म्हणाले. त्यांनी आज जवानांशी संवाद साधला आणि त्यांचं मनोबलही वाढवलं.

“जर भारताच्या स्वाभिमानावर कोणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही ते सहन करणार नाही आणि त्यांना योग्य भाषेत उत्तरही दिलं जाईल. सध्या भारत आणि चीनदरम्यान जी काही चर्चा झाली ती सकारात्मक आहे. या प्रकरणाचा तोडगा निघाला पाहिजे. परंतु हा तोडगा कुठपर्यंत निघेल याची सध्या कोणतीही हमी मी आता देऊ शकत नाही,” असं ते लडाखमधील लुकुंग चौकीवर भारतीय लष्कराच्या जवानांना संबोधित करताना म्हणाले.