उत्कृष्ट नियोजनाद्वारे करोनाच्या संकटावर जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या भारतानं नियंत्रण मिळवलं आहे. या आजारावरील लस निर्मिती प्रक्रियेतही भारत आघाडीवर राहिला आहे. त्यामुळे अवघं जग भारताकडं आशेने पाहत आहे. जागतिक स्तरावरील आपली जबाबदारी ओळखून भारतही कौतुकास्पद पावलं टाकत आहे. नुकताचं भारतानं भूटान आणि मालदीव या आपल्या सख्या शेजारी देशांना भेट स्वरुपात करोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा केला आहे.

एएनआयच्या माहितीनुसार, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन भूटानची राजधानी थिंफूकडे सीरम इन्स्टिट्यूटने बनवलेल्या कोविशिल्ड लसीचे १.५ लाख डोस पाठवण्यात आले आहेत. तसेच मालदीवची राजधानी माले येथे मुंबईतून कोविशिल्डचे १ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.

भारत हा जगातील लस निर्मिती उद्योगातील एक प्रमुख देश म्हणून ओळखला जातो. आजवर भारतानं जगातील अनेक देशांना विविध आजारांवरील औषधे तसेच लसींचा पुरवठा केला आहे. करोनाच्या या संकट काळात सध्या भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु आहे. दरम्यान, भारतातील कंपन्यांना जगातील अनेक देशांनी लस पुरवठ्यासाठी आगाऊ नोंदणी केली आहे. दरम्यान, भूटान आणि मालदीव या शेजारील देशांना भारतानं भेट स्वरुपात लस पाठवली आहे.

भारत सरकारकडून सीरमच्या ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकच्या ‘कोव्हॅक्सिन’ या दोन लसींना आपत्ककालिन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे.