१० वर्षांत पाकिस्तानला जाणारे पहिले पंतप्रधान; सौहार्दपर्व गतिमान
रशिया व अफगाणिस्तान दौऱ्यावरून परतताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी पाकिस्तानला अचानक भेट देत दोन्हीही देशांमध्ये महिनाभरापासून सुरू झालेले सौहार्दपर्व अधिक गतिमान करण्याचा प्रयत्न केला. सुमारे ८० मिनिटांच्या या अनपेक्षित भेटीमुळे मागील दहा वर्षांत पाकिस्तान दौरा करणारे मोदी पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचा वाढदिवस आणि त्यांच्या नातीचा विवाह, हे निमित्त साधत मोदी यांनी पाकिस्तानला ही अवचित भेट दिली.
‘एअर इंडिया’च्या विशेष विमानाने सायंकाळी ४ वाजून ५० मिनिटांनी लाहोरच्या अल्लामा इक्बाल विमानतळावर लाल रंगाचा वेस्टकोट आणि शुभ्र कुर्ता-पायजमा या पेहरावात दाखल झालेल्या मोदी यांचे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे आलिंगन देऊन स्वागत केले. त्यानंतर लाहोरजवळच्या रायविंद येथील शरीफ यांच्या राजेशाही प्रासादाकडे उभय नेते हेलिकॉप्टरने गेले. शुक्रवारी शरीफ यांचा वाढदिवस होता, तर त्यांची नात मेहरुन्निसाचे लग्न होते. शरीफ यांनी मोदी यांना दूरध्वनी करून लग्नाचे निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमात मोदींसह इतर भारतीय पाहुण्यांसाठी विशेष मेजवानीचा घाट घालण्यात आला होता. दोन्ही देशांमधील विवाद्य मुद्दय़ांवर या वेळी उभयतांनी चर्चा केली. त्यानंतर पुन्हा शरीफ यांच्या हेलिकॉप्टरने ते लाहोर विमानतळावर दाखल झाले.
भारत-पाकमधील संवादप्रक्रिया अनेक महिन्यांपासून ठप्प होती. ६ डिसेंबरला दोन्हीही देशांच्या संरक्षण सल्लागारांनी अनपेक्षितपणे एकमेकांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली होती. पॅरिस हवामान परिषदेतही मोदी व शरीफ यांच्या भेटीमुळे दोन्ही देशांदरम्यान चर्चेसाठी आशादायक वातावरण तयार होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच मागील आठवडय़ात परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही इस्लामाबाद दौरा केला होता. त्या पाश्र्वभूमीवर अचानक झालेली मोदी-शरीफ भेट दोन्हीही देशांदरम्यानचे संबंध सकारात्मक वळणावर घेऊन जाईल, अशी आशा निर्माण झाली आहे.

काँग्रेसची टीका
मोदींची ही भेट भारताचे हित जोपासण्यासाठी नव्हे तर खासगी व्यापारी हितसंबंध जपण्यासाठी होती, अशी टीका काँग्रेसने केली आहे. पाकिस्तानी नेत्यांसोबत व्यापारी संबंध असलेल्या उद्योजकानेच ही भेट योजली होती आणि ती पूर्वनियोजित होती. गेल्या ६७ वर्षांत एकाही पंतप्रधानाने असे बेजबाबदार वर्तन केलेले नाही, असे काँग्रेस प्रवक्त्याने सांगितले. मुंबई हल्ल्याचे सूत्रधार मोकाट फिरत असताना आणि दाऊदला परत आणता येत नसताना अशा ‘उत्स्फूर्त’ भेटींचा काय उपयोग, असा खडा सवाल काँग्रेसने केला आहे.

– संबंधित सत्ताबाजार