महत्वाकांक्षी चांद्रयान-२ चे काऊंडाऊन सुरु झाल्यानंतर अवकाश संशोधनामध्ये भारत आता भविष्यातही आणखी महत्वपूर्ण कामगिरी करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यासाठी अवकाशात स्वतःचे अंतराळ स्थानक निर्मितीचे नियोजन असल्याचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे (इस्रो) प्रमुख डॉ. के. सिवन यांनी म्हटले आहे.

हा महत्वाकांक्षी प्रकल्प ‘गगनयान’ मोहिमेचा पुढील भाग असेल असेही डॉ. सिवन यांनी स्पष्ट केले आहे. अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेनंतरही आपल्याला ‘गगनयान’ कार्यक्रम टिकवून ठेवायचा आहे. त्यासाठीच भारत अवकाशात स्वतःचे अंतराळस्थानक निर्माण करण्याची तयारी करीत असल्याचे डॉ. सिवन यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, आण्विक ऊर्जा आणि अंतराळ संशोधन राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी नुकतेच म्हटले की, भारताने २०२२ मध्ये आपल्या ७५ व्या स्वातंत्र्यवर्षपूर्तीनिमित्त अंतराळात माणूस पाठवण्याच्या मोहिमेला सुरुवात केलेली असेल. यासाठी राष्ट्रीय सल्लागार परिषदेकडून तयारीही सुरु असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर चांद्रायन-२ नंतर भारताने आता शुक्र आणि सुर्याच्या अभ्यासाचे लक्ष्य निश्चत केले आहे. भविष्यातील अंतराळ संशोधनातील विविध मोहिमांसाठी भारताला स्वतःचे अंतराळस्थानक असल्याचा मोठा फायदा होऊ शकतो. सध्या अंतराळात दोनच स्थानके आहेत एक आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानक तर दुसरे चीनचे स्वतःचे अंतराळस्थानक आहे.